धाराशिव: धाराशिव मधून एक हत्येची धक्कदायक बातमी समोर आली आहे. दोन मित्रांनीच आपल्या ३५ वर्षीय मित्राची हत्या केल्याचे समोर आले आहे. जुन्या भांडणाच्या रागातून ही हत्या करण्यात आली. ही हत्या अपघात असल्याचे दाखवण्यात आले. मात्र तो अपघात नसून डोक्यात जड वस्तू वार करून क्रूरपणे हत्या केल्याचा आरोप मृतकाच्या पत्नीने केला आहे. ही घटना धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील कंडारी ते सोनारी रस्त्यावर घडली. आंबी पोलिसांनी या प्रकरणी दोन संशयितांना अटक केली आहे. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून कंडारी परिसरात खळबळ उडाली आहे.
चंद्रपुरातील किडनी प्रकरण समोर येताच पोलिसांकडून मोठी कारवाई; सहा जणांवर गुन्हा दाखल करून…
नेमकं काय घडलं?
मृतकाचे नाव मोतीराम जाधव असे आहे. मोतीराम हे सोमवारी रात्री ९च्या सुमारास कुटुंबासह घरी जेवण करत होते. त्याच वेळी त्यांचे मित्र विष्णू कालिदास तिंबोळे आणि योगेश नागेश तिंबोळे हे मोटारसायकलवरून त्यांच्या घरी आले. त्यांनी मोतीराम यांना पप्पू रावखंडे यांच्या बंगल्यावर पार्टी केली आहे. तिकडे जेवण करायला चल, असे म्हणत त्यांना चालू जेवणाच्या ताटावरून उठवले आणि मोटारसायकलवर बसवून सोबत घेऊन गेले. मोतीराम यांना घेऊन गेलेल्या दोन मित्रांपैकी विष्णू तिंबोळे हा रात्री १० च्या सुमारास एकटाच मोतीराम यांच्या घरी आला आणि त्यांनी मोतिरामचं अपघात झाल्याचे सांगितले. कंडारी ते सोनारी रोडवर पप्पु रावखंडे यांच्या बंगल्यासमोर अपघात झाला असे तिंबोळे याने सांगितले.
मृतक मोतिरामची पत्नी सोनाली जाधव आणि आई रतन हे तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मोतीराम जाधव हे रस्त्यावर पडलेले होते. त्यांच्या डोक्याला मोठी दुखापत झाली होती. चेहरा ठेचला गेलेला होता आणि रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रक्त सांडलेले होते. एवढेच नाही तर काही ठिकाणी सांडलेल्या रक्तावर पाणी आणि माती टाकलेली दिसून आली. अपघात तिघांपैकी केवळ मोतीराम यांचाच कसा झाला. असा जाब पत्नीने विचारला तर आरोपी मित्रांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. यामुळे हा अपघात आहे की घातपात याचा संशय बळावला.
सोनालीने पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मोतीराम जाधव, विष्णु तिंबोळे आणि योगेश तिंबोळे यांच्यात जुन्या भांडणावरून वाद होता. हे भांडण तात्या रावखंडे व पप्पू रावखंडे यांनी सोडवण्याचा प्रयत्नही केला होता. ज्यात तात्या रावखंडे हे जखमी झाले होते. जुन्या भांडण्याच्या रागातून विष्णू तिंबोळे व योगेश तिंबोळे यांनी मोतीराम जाधव यांच्या डोक्यात जड वस्तूने वार करून त्यांचा खून केला आणि अपघाताचा बनाव करण्याचा प्रयत्न केला, असा गंभीर आरोप फिर्यादीत केला.
घातपात असल्याचं स्पष्ट
पोलिसांनी फिर्याद नोंदवली आणि तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. आंबी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत विष्णू कालिदास तिंबोळे आणि योगेश नागेश तिंबोळे यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवला आहे. फॉरेन्सीक टीमकडून करण्यात आलेल्या पंचनाम्यात हा अपघात नसून घातपातच असल्याचे स्पष्ट झाले आहे. कंडारी – सोनारी रस्त्यावर घटनास्थळी तात्या रावखंडे यांच्या घराशेजारील पत्र्याच्या शेडमध्ये रक्ताचे डाग दिसून आले. या ठिकाणाहून रस्त्यापर्यंत रक्ताचे डाग दिसत होते. एवढेच नव्हे तर, काही ठिकाणी रक्ताचे डाग पाण्याने धुऊन काढले असून, काही ठिकाणी माती व वाळू टाकून रक्ताचे निशाण लपवण्याचा प्रयत्न झाल्याचे पंचनाम्यात स्पष्ट झाले आहे. यावरून आरोपींनी खुनानंतर पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते.
संशयित अटकेत
घटनेनंतर काही तासांतच दोन्ही संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांची कसून चौकशी सुरू आहे. हा अपघात नसून, पूर्ववैमनस्यातून केलेला खून आहे का, डोक्यात कोणत्या जड वस्तूने मारले गेले, तसेच तात्या रावखंडे यांना झालेल्या दुखापतीचा आणि खुनाचा काय संबंध आहे, याचा सखोल तपास पोलीस करीत आहेत.
Ans: धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यात कंडारी–सोनारी रस्त्यावर.
Ans: विष्णु कालीदास तिंबोळे व योगेश नागेश तिंबोळे.
Ans: जखमांचे स्वरूप, रक्त पुसण्याचे पुरावे व विरोधाभासी माहितीमुळे.






