
दिल्लीच्या वाटेवर निघाले अन् काळाने घातला घाला; संभाजीनगरच्या चौघांचा अपघातात मृत्यू
छत्रपती संभाजीनगर : घरच्यांचा निरोप घेत, व्यवसाय वाढविण्याची स्वप्ने उराशी बाळगत सहा जण बुधवारी रात्री दिल्लीकडे निघाले होते. दुसऱ्या दिवशी नव्या मशीनरीची खरेदी करून परत येण्याच्या गप्पा रंगल्या होत्या. मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते. मध्यप्रदेशातील मंदसौर जिल्ह्यात मुंबई-दिल्ली एक्सप्रेस वेवर गुरुवारी सकाळी त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला आणि क्षणार्धात कुटुंबांचे आधारवड हिरावले गेले. या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले. संभाजीनगरात ही बातमी धडकताच व्यापारी, मित्रपरिवार आणि नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला.
राजेंद्र भावराव कवडे (वय ४६), संदीप नवनाथ बोरसे (वय ३५), सचिन गंगाधर गजभारे (वय ३७) आणि रवींद्र भागवत काळे (वय २८) अशी मृतांची नावे आहेत. अब्दुल खलील अब्दुल समद (वय ३०) आणि उमर इस्माईल जागीदार (वय ३२) हे गंभीर जखमी झाले आहेत. कॅनॉट परिसरात फोन प्लॅनेट या नावाने मोबाइल रिपेरिंगचे आधुनिक केंद्र सुरू करणारे राजेंद्र कवडे हे व्यवसायात नवे तंत्रज्ञान आणण्यासाठी प्रयत्नशील होते. दिल्लीतील सदर बाजारातून अत्याधुनिक मशीनरी खरेदी करण्यासाठी त्यांनी हा दौरा आखला होता. बुधवारी रात्री अकराच्या सुमारास ते सहकाऱ्यांसह कारने दिल्लीकडे रवाना झाले. जळगावमार्गे मध्यप्रदेशात पोहोचल्यानंतर गुरुवारी सकाळी मंदसौरजवळ त्यांच्या वाहनाची ट्रकला जोरदार धडक बसली. अपघात एवढा भीषण होता की चौघांना जीव गमवावा लागला.
चिमुकल्याच्या डोक्यावरून पितृछत्र हरपले
रवींद्र काळे हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा. साडेतीन वर्षांचा मुलगा आणि गर्भवती पत्नी असा त्याचा परिवार. घराची जबाबदारी सांभाळणारा रवींद्र बुधवारी रात्री नेहमीप्रमाणे कामासाठी बाहेर पडला; पण परतलाच नाही. वडिलांच्या निधनाची कल्पनाही नसलेल्या त्या चिमुकल्याकडे पाहून नातेवाईकांच्या डोळ्यांत अश्रू दाटत होते.
अपघाताची बातमी खरी ठरली
दुर्घटनेची माहिती सकाळी शहरात पोहोचताच अनेकांच्या मोबाईलवर एकच संदेश फिरू लागला. काहींनी बातमी खरी नसावी, अशी प्रार्थना केली; मात्र काही वेळातच मृत्यूची माहिती निश्चित झाली आणि सर्वत्र शोककळा पसरली.
व्यवसायाची स्वप्ने अपूर्णच राहिली
काही महिन्यांपूर्वीच राजेंद्र कवडे यांनी नवीन दुकान सुरू केले होते. शहरातील ग्राहकांना अत्याधुनिक सेवा देण्याचे त्यांचे स्वप्न होते. त्यासाठी लागणारी यंत्रसामग्री आणण्यासाठी ते दिल्लीला निघाले होते. मित्रांना कायम सोबत घेऊन चालणारा, नव्या कल्पनांवर चर्चा करणारा हा उत्साही चेहरा कायमचा हरपल्याने मोबाइल व्यावसायिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
तुम्ही त्यांच्यासोबत होता का?
कॅनॉट परिसरातील मोबाइल व्यावसायिक अमोल पाटील यांनाही या दौऱ्यासाठी सोबत येण्याबाबत राजेंद्र कवडे यांनी विचारणा केली होती. मात्र अन्य कामामुळे त्यांनी जाणे टाळले. गुरुवारी सकाळी अपघाताची बातमी समजताच त्यांना अनेकांचे फोन आले. तुम्हीही त्यांच्यासोबत गेला होता का? अशी विचारणा अनेकांनी केली. काही तासांपूर्वी झालेला संवादच आता त्यांच्या आठवणींचा भाग ठरला आहे.