
धक्कादायक ! जमिनीच्या वादातून कुऱ्हाडीने सपासप वार; लोखंडी रॉडनेही केला हल्ला
छत्रपती संभाजीनगर : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या घटना घडत आहेत. त्यातच आता तिसगाव शिवारात जमिनीच्या वादातून एका कुटुंबावर कुऱ्हाड, लोखंडी रॉड व काठीने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात शेतकरी, त्यांचा मुलगा व चुलत भाऊ गंभीर जखमी झाला. ही घटना गट क्रं. ६६ तिसगाव परिसरात घडली.
गणेश आसाराम चौधरी, निता उर्फ आशा गणेश चौधरी, मुलगा पियुश गणेश चौधरी, अभिषेक युवराज सुर्यवंशी, विजय देविलाल सलामपुरे, जय देविलाल सलामपुरे (सर्व रा. तिसगाव) अशी कुऱ्हाडीने मारहाण करणाऱ्यांची नावे असून, त्यांच्याविरोधात एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहन आसारमा चौधरी (वय ५६, रा. गट क्रं. ६६, तिसगाव) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार, जमिनीच्या वादातून आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांवर अचानक हल्ला चढवला. कुऱ्हाडीच्या पात्याच्या उलट्या बाजूने वार, लोखंडी रॉड व काठीने मारहाण करून गंभीर दुखापती करण्यात आल्या.
हेदेखील वाचा : Uttar Pradesh Crime: सामूहिक हत्याकांड! तरुणाने आपल्याच कुटुंबातील चार जनाची कुऱ्हाडीने केली हत्या; कारण काय?
फिर्यादी मोहन चौधरी हे शेतात असताना अभिषेक युवराज सूर्यवंशी याने त्यांच्या कपाळावर व उजव्या खांद्यावर कुऱ्हाडीच्या पात्याच्या उलट्या बाजूने वार करून जखमी केले. याचवेळी फिर्यादीचा मुलगा शिवम याच्या डोक्यावरही कुऱ्हाडीचा उलटा वार करण्यात आला. दरम्यान, विजय देवीलाल सलामपुरे याने फिर्यादीच्या चुलत भावाच्या डोक्यावर लोखंडी रॉडने मारहाण केली, तर जय देवीलाल सलामपुरे याने काठीने मारून दुखापत केली.
वडील-मुलासह चुलत भावाला मारहाण, पोलिसांत गुन्हा नोंद
यावेळी गणेश आसाराम चौधरी, निता उर्फ आशा गणेश चौधरी व त्यांचा मुलगा पियूष चौधरी यांनी शिवीगाळ व दमदाटी केल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक रावसाहेब काकड करीत आहेत.