
दारूच्या नशेत एकाची हत्या; आधी शिवीगाळ झाली, नंतर थेट दांडक्यानेच मारलं...
पुणे : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या घटना घडत आहेत. त्यातच आता दारु पिल्यानंतर झालेल्या भांडणात एकाचा खून झाला. हा प्रकार येरवडा येथील कामराजनगर भागात घडला. याप्रकरणी लक्ष्मीनगर पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
माशक गाजीबक्ष विजापुरे (वय ४०, रा. गजराज चौक) असे खून झालेल्याचे नाव आहे. तो केटरींगचा व्यवसाय करत होता. याप्रकरणी, गणेश वसंत शिंदे (रा. येरवडा) याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी, रात्री उशीरापर्यंत आरोपी गणेश शिंदे याच्याविरुद्ध लक्ष्मीनगर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. याबाबत बोलताना लक्ष्मीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविंद्र कदम यांनी सांगितले, माशक विजापुरे आणि आरोपी गणेश शिंदे हे दोघे एकमेकांचे मित्र आहेत. ते दोघे दारु पिल्यानंतर कामराज नगर परिसरात बसले होते. शिवीगाळ केल्याच्या कारणातून दोघांत वाद झाला. त्यावेळी गणेश याने माशक याच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्यामुळे माशक जागीच कोसळला.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविंद्र कदम घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी माशक याला उपचारासाठी नजगीच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारापुर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर, पोलिसांनी वेगवान तपास करत आरोपी गणेश याला बेड्या ठोकल्या.
वर्ध्यातही किरकोळ कारणावरून तरुणाची हत्या
दुसऱ्या एका घटनेत, वर्ध्याच्या आर्वी येथील रहिवासी असलेल्या शेख शाहरुख शेख रऊफ याची हत्या करण्यात आली. पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याचे समोर आले आहे. आर्वी येथील शेख शाहरूख याची हत्या झाली. जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी नियोजनबद्ध कट रचून हत्या करण्यात आली. आरोपी इतक्यावरच थांबले नाही तर त्यांनी कुणालाही या घटनेची माहिती मिळू नये, या हेतूने अमरावती जिल्ह्यात मृतदेह नेत जाळून पुरावेही नष्ट केले. याप्रकरणी अमरावती जिल्ह्याच्या पथ्रोट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे.
हेदेखील वाचा : मदतीसाठी गेलेल्या ‘त्या’ नराधमानेच गर्भवतीची केली हत्या; लग्न करण्याचे आमिष दाखवत सातत्याने संबंध