
Crime News: 'टीडब्ल्यूजे' कंपनीचा मालक समीर नार्वेकर पत्नीसह अटकेत; अनेकांना कोट्यवधींचा चुना
सर्वात मोठ्या आर्थिक घोटाळेबाजाला अखेर बेड्या
अधिकृत आकडा समोर येण्याची शक्यता
घोटाळ्यातील आर्थिक व्यवहारांचे तपशील लवकरच येणार समोर
चिपळूण: महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांपासून ते राज्यातील बडे राजकारणी, मंत्री-आमदार तसेच प्रशासनातील आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा चुना लावणाऱ्या टिडब्लूजे कंपनीच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे.
टिडब्लूजे कंपनीचा मालक व व्यवस्थापकीय संचालक समीर नार्वेकर, त्याची पत्नी नेहा नार्वेकर आणि संचालक अमीत पालम या तिघांना ठाणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने शुक्रवारी अटक केली आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात चर्चेत असलेल्या या आर्थिक फसवणूक प्रकरणात टिडब्लूजे कंपनीने विविध योजनांच्या माध्यमातून नागरिकांना मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले होते.
मात्र काही काळानंतर कंपनीने अचानक व्यवहार बंद करून गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले. या प्रकरणात काही दिवसांपूर्वी रत्नागिरी पोलिसांनी टिडब्लूजे कंपनीचा संचालक संकेश घाग याला अटक केली होती. त्यानंतर तपासाला गती मिळाली आणि आता कंपनीचा प्रमुख समीर नार्वेकर व त्याची पत्नी नेहा नार्वेकर यांनाही अटक झाल्याने या घोटाळ्याचा अधिकृत आकडा समोर येण्याची शक्यता आहे. फसवणूक उघडकीस आल्यानंतर समीर नार्वेकर महाराष्ट्राबाहेर पळून गेल्याची माहिती होती. मात्र ठाणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने तांत्रिक तपास व गुप्त माहितीच्या आधारे त्याला ताब्यात घेत मोठी कारवाई केली आहे.
टिडब्लूजे घोटाळ्यात अनेक मोठ्या व्यक्तींची गुंतवणूक असल्याचे बोलले जात असून या प्रकरणात आणखी काही संचालक व मध्यस्थांचा सहभाग असण्याची शक्यता तपास यंत्रणा व्यक्त करत आहे. अटकेनंतर आरोपींकडून चौकशीसुरू असून फसवणुकीचा नेमका आकडा आणि आर्थिक व्यवहारांचे तपशील लवकरच समोर येणार आहेत.
भोस्ते घाट अपघात; चालकावर गुन्हा
मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात झालेल्या अपघातप्रकरणी ट्रकचालक फैजान जाकिरभाई पिरा (२४, गुजरात) याच्यावर गुरुवारी रात्री येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. राजपाल रामचंद्र यादव (४१) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. ते आपल्या ताब्यातील ट्रक घेऊन गोवा येथून मुंबईच्या दिशेने जात होती. भोस्ते घाट उतरत असताना पाठीमागून आलेल्या ट्रकने धडक दिली. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. वाहतूकही काहीकाळ खोळंबली होती.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.