
तळबीड परिसरातील अवैध वेश्या व्यवसायावर धडक कारवाई, दोन परराज्यातील महिलांची सुटका
उंब्रज : सातारा जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. सातारा जिल्ह्यात अवैध वेश्याव्यवसायाविरोधातील कारवाया अधिक तीव्र करण्यात आल्या असून, “ऑपरेशन मुस्कान” अंतर्गत कराड उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या पथकाने तळबीड परिसरात मोठी कारवाई करत दोन पीडित महिलांची सुटका केली आहे.
निखिल पिंगळे आणि डॉ. वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभर अवैध धंद्यांविरोधात मोहिम राबविण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर राजश्री पाटील यांना मौजे वराडे (ता. कराड) येथील हॉटेल शुक्रतारा येथे अवैध वेश्या व्यवसाय सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे तळबीड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे, महिला पोलीस उपनिरीक्षक शितल पाटील यांच्यासह विशेष पथकाला छापा टाकण्याचे आदेश देण्यात आले. पथकाने डमी ग्राहकाच्या माध्यमातून खातरजमा करून पंचांसमक्ष हॉटेल शुक्रतारा येथे धाड टाकली.
या कारवाईत हॉटेल व्यवस्थापक सुरज मारुती सावंत (वय २७, रा. भिकवडी, ता. कडेगाव, जि. सांगली) हा दोन महिलांकडून अवैध वेश्या व्यवसाय चालवत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तत्काळ दोन परराज्यातील पीडित महिलांची सुटका करत संबंधितांविरोधात अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास महेंद्र जगताप हे करत आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील अवैध वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तींच्या व्यक्तींविरोधात यापुढेही कठोर आणि सातत्यपूर्ण कारवाया सुरू राहतील, असा इशारा जिल्हा पोलीस प्रशासनाने दिला आहे. तसेच या यशस्वी कारवाईबद्दल उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील आणि संपूर्ण कारवाई पथकाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
आयुर्वेदिक मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यावसाय
गेल्या काही दिनसाखाली भारती विद्यापीठ येथील दत्तनगरमधील चंद्रभागा चौकात ‘योग आयुर्वेदिक पोटली मसाज’ सेंअरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यावसायावर गुन्हे शाखेच्या पथकाने छापेमारी केली आहे. छापा कारवाईत पोलिसांनी येथून पाच मुलींची सुटका केली आहे. गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतुक व व्यापार प्रतिबंधक कक्षाने ही कारवाई केली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता १४३(१)(३), ३(५) अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ३,४,५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.