
मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेला तरुण बांधकामाच्या ठिकाणी मजूर म्हणून काम करतो. तो आपल्या कुटुंबातील एकमेव कमावता सदस्य असून परिसरात त्याची ‘चांगला माणूस’ म्हणून त्याची ओळख होती. पण रविवारी त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये तो वादग्रस्त घोषणा देताना दिसत आहे. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत त्याच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम १९२ आणि १९६(१) अंतर्गत (धर्माच्या आधारावर दोन गटांत शत्रूत्वाला प्रोत्साहन देणे) गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, तरुणाला अटक झाल्यानंतर परिसरातील त्यांच्या हिंदू (Hindu-Muslim Politics) शेजाऱ्यांनीही या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे. ‘हा मुलगा गुन्हेगारी प्रवृत्तीचा नाही. “ज्या गोष्टीला तो विनोद समजत होता, तिचे एवढे गंभीर पडसाद उमटतील याची त्याला कल्पना नसावी,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
तर तरुणाच्या कुटुंबियांनी आणि मित्रांनीही यावर प्रतिक्रीया दिली आहे. त्याला त्याच्याच एका मित्राने अशा घोषणा देण्यासाठी ‘उत्तेजित’ केले होते. ऑनलाइन समोर आलेला व्हिडिओ एडिटेड आहे. त्या तरुणाने आपल्या कृत्याबद्दल आधीच माफी मागितली होती, असेही कुटुंबाने सांगितले आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून परिसरात शांतता राखण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
अटक केलेल्या तरुणाची आई घरकाम करते. त्याच्या आईनेदेखील आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “तुम्ही व्हिडिओ पाहिला तर तुम्हालाही कळेल, कोणतरी माझ्या मुलाला बोलण्यास भाग पाडले जात होते. त्याला त्या प्रकरणाचे गांभीर्य समजले नाही. तो फक्त २० वर्षांचा आहे. त्याने आधीच त्याच्या चुकीबद्दल माफी मागितली आहे आणि इतर कुणाचीही माफी मागायची असेल तर मी त्याचीही माफी मागण्यास तयार आहे. ”
तर मुलाची काकू म्हणते, “आमचा पाकिस्तानशी काहीही संबंध नाही. आम्ही भारतीय आहोत, भारतात जन्मलो आहोत आणि इथेच मरणार आहोत… त्याने जे काही सांगितले ते त्याने गांभीर्याने घेतले नाही.” तर, गेल्या अनेक वर्षांपासून या कुटुंबियांशी ओळख असणारा एक हिंदू शेजाऱ्याने सांगितले की, “२० वर्षांचा मुलगा एक चांगला मुलगा आहे. त्याच्या वडिलांचे निधन झाले आहे. तो सकाळी ९ वाजता कामावर जातो आणि त्यानंतर आईसोबत असतो. जर तो खरोखरच वाईट प्रवृत्तीचा असेल तर त्याला शिक्षा झाली पाहिजे, पण तो तसा नाही. तो प्रत्यक्षात एक चांगला मुलगा आहे. अजाणतेपणाने त्याची चूक झाली असावी.
दुसऱ्या एका शेजाऱ्याने सांगितले की, ‘हिंदू आणि मुस्लिम सर्वजण येथे कुटुंबासारखे राहतात. दुसऱ्या एका महिलेने सांगितले की,’ तिच्या पतीच्या मृत्युनंतर, शेजारच्या मुस्लिम कुटुंबांनी तिला सर्वात मोठी मदत केली. आमची मुले आमच्या हिंदू शेजाऱ्यांसोबत आंबेडकर जयंती, अण्णाभाऊ साठे जयंती आणि शिवजयंती साजरी करतात. त्याने चूक केली आणि त्याची माफी स्वीकारली पाहिजे. त्याच्या कुटुंबाचा मुख्य आधार असलेल्या तरुणाला अटक का करावी?” असा सवालही संबंधित महिलेने उपस्थित केले आहेत.