मी शेवटचं सांगतो, शहर सोडून जा, नाहीतर...; पोलीस आयुक्तांचा गुन्हेगारांना दम
पुणे/ अक्षय फाटक : काहींना मस्ती आली आहे. त्यांना सक्त ताकीद आहे. बेकायदा गोष्टी करत असाल तर हे शहर सोडून जा, अन्यथा तुमच्या सात पिढ्यांची आठवण करून देऊ, असा सज्जड दम पुन्हा एकदा पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी गुन्हेगारांना दिला आहे.
परिमंडळ पाचमधील सहा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध गुन्ह्यातील ८० तक्रारदारांना चोरीस गेलाला दोन कोटी रुपयांचा किंमती मुद्देमाल पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या हस्ते पुन्हा प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी अप्पर आयुक्त मनोज पाटील, प्रविण पाटील, शैलेश बलकवडे, परिमंडळ पाचचे उपायुक्त राजकुमार शिंदे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पोलीस आयुक्त म्हणाले, शहरातील मंगळसूत्र, गळ्यातील सोन साखळी यामागे एक भावना असते. प्रत्येकाला ते परत मिळेल अशी अपेक्षा नसते. ते परत मिळविण्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया तसेच वकिलांचा खर्च करावा लागतो. त्यामुळे आम्हीच पुढाकार घेतला आणि नागरिकांची आर्थिक नुकसान टाळत त्यांना लवकर त्यांचा मुद्देमाल मिळेल, अशी व्यवस्था केली. शहरातील इतरही परिमंडळात हा उपक्रम घेतला जाईल.
काही लोकांना मस्ती आलेली आहे. त्यांना ताकीद दिली आहे. तरीही ते मस्तीत आहेत. पण, त्यांना एक विनंती आहे, बेकायदेशीर धंदे केले, गँग चालवून खंडणी मागितली, किंवा बळाच्या जोरावर जमीन खाली करायला लावत असाल तर हे शहर सोडून जा, नाहीतर तुमच्या ७ पिढ्यांची आठवण करून देऊ.
बेवारस गाड्यांच्याबाबत ही कारवाई
शहरात बेवारस वाहनांची संख्या मोठी आहे. परंतु, त्याबाबतही कारवाई करण्याचा सूचना देण्यात आलेल्या आहेत. मालक शोधण्याचे काम सुरू केले आहे. तर, इतर बेवारस मुद्देमाल देखील मुळ मालकांना देण्यासाठी प्रयत्न करण्याबाबत सूचना दिल्या आहेत.
हे सुद्धा वाचा : जेजुरी पोलिसांना चोरट्यांचे आव्हान, नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण; 18 दिवसात…
तुम्हीही पोलीस आहात…
पुणे पोलीस जनतेचे आभारी आहेत, तुम्ही आमच्यावर दाखवलेला विश्वास अभिनंदन करण्यासारखा आहे. जनता खाकीमधील पोलीस नसली तरी तुम्ही एक पोलीस आहात, जेवढे अधिकार आम्हाला आहेत तेव्हढेच अधिकार तुमच्याकडे आहेत.
जेलमधून बाहेर आला अन् तिघांना तोडला
पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पुण्यातील वेगवेगळ्या भागातून दररोज गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत असतात. टोळक्यांकडून वाहनांची तोडफोड व दहशत माजविण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. अशातचं गेल्या काही दिवसाखाली कारागृहात राहून आलेल्या सराईत गुन्हेगार व त्याच्या साथीदारांनी तीन तरुणांवर किरकोळ वादातून तीक्ष्ण शस्त्राने वार करून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना मुंढवा परिसरात घडली. एक महिन्यापुर्वीच सराईत कारागृहातून बाहेर आला होता. याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात महेश गजसिंह उर्फ दाद्या उर्फ डी याच्यासह दोन ते तीन अनोळखी साथीदारांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या हल्यात अजय हनुमंत पवार (वय ३१), अमित राजेश परदेशी (वय २६) व सोहेश अलमले (वय २६) हे तिघे जखमी झाले आहेत. याबाबत तुषार मेमाणे (वय २८) यांनी तक्रार दिली आहे.