
संगमेश्वरमध्ये पकडली बांगलादेशी महिला
बेकायदा वास्तव्य केल्याप्रकरणी पती-पत्नीविरुद्ध गुन्हा
परदेशी महिलेला आश्रय देऊन पतीने केली धूळफेक
संगमेश्वर: संगमेश्वर तालुक्यात सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर आणि खळबळजनक प्रकार उघडकीस आला असून, बांगलादेशातून बेकायदेशीरपणे भारतात घुसखोरी केलेल्या एका महिलेला संगमेश्वरमधील आंबेड खुर्द येथे चक्क आश्रय देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संगमेश्वर पोलिसांनी (Ratnagiri) ६ मार्च २०२६ रोजी रात्री उशिरा मोठी धडक कारवाई करत, संबंधित बांगलादेशी महिलेसह तिला मदत करणाऱ्या तिच्या पतीवर गुन्हा दाखल केला आहे.
संगमेश्वर तालुक्यातील आंबेड खुर्द मुस्लिम मीहल्ला येथील युसूफ महंमद सय्यद याने सिनेम युसूफ सय्यद उर्फ शांतना अहमद खान (मूळ रा. खिलगाव, जिल्हा गाजीपुर, ढाका, बांगलादेश) ही परदेशी नागरिक आहे, हे पूर्णपणे माहित असतानाही तिच्याशी लग्न केले, आरोपी युसूफने तिला भारतात बेकायदेशीरपणे वास्तव्य करण्यासाठी केवळ आश्रयच दिला नाही, तर ती भारतीय नागरिक असल्याचे भासवण्यासाठी तिची बनावट सरकारी कागदपत्रे तयार करून घेतली. या बनावट आधारकार्ड आणि पॅनकार्डच्या आधारे चक्क कॅनरा बँकेत खाते उघडून भारतीय प्रशासकीय आणि बँकिंग व्यवस्थेची मोठी फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
“दबाव किंवा धमक्या देण्यासाठी…”; बांग्लादेशी, रोहिंग्या घुसखोर प्रकरणात Mangal Prabhat Lodha आक्रमक
एका घुसखोर महिलेने भारतीय व्यवस्थेचा अशा प्रकारे गैरफायदा घेतल्याने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ६ मार्च २०२६ रोजी दुपारी २.२५ वाजता संगमेश्वर पोलिसांनी आबेड खुर्द येथील संशयित पत्त्यावर अचानक छापा टाकला. यावेळी ही महिला कोणत्याही वैध अधिकाराशिवाय भारतात अवैधरित्या वास्तव्य करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. या प्रकरणी महिला पोलिस कॉन्स्टेबल कोमल उत्तम ढोले यांनी फिर्याद दिली असून, त्यानुसार पती पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
तपासादरम्यान संबंधित महिला बांगलादेशी नागरिक असल्याचे ठोस पुरावे समोर आल्याने पोलिसांनी तिला तातडीने ताब्यात घेतले. घुसखोरीच्या घटनेने संगमेश्वरच्या शांततेला सुरुंग लावला आहे. भारतीय पतीने केवळ आश्रयच नव्हे, तर भारतीय प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक करून या पस्देशी महिलेचे बनावट पॅनकार्ड आणि आधारकार्ड देखील तयार करण्यात आले. या कारवाईने संपूर्ण संगमेश्वर तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.