
संभाजीनगर हादरलं! ३ महिन्यांत ४६८ नागरिक बेपत्ता (Photo Credit- AI)
पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, एकूण ४६८ प्रकरणांपैकी २४७ जणांचा शोध लागला आहे, तर २२१ जण अद्याप बेपत्ता आहेत. विशेष म्हणजे, न सापडलेल्या व्यक्तींमध्येही महिलांचे प्रमाणच अधिक असून १३२ महिला अजूनही सापडलेल्या नाहीत. त्यामुळे बेपत्ता प्रकरणांमध्ये महिलांचे वर्चस्व कायम असल्याचे स्पष्ट होत आहे. एकूण आकडेवारी पाहता, १९६ पुरुष, २६६ महिला आणि ६ इतर असे चित्र समोर आले आहे. महिलांचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत लक्षणीयरीत्या अधिक असल्याने ही बाब गंभीर सामाजिक आणि कायदा-सुव्यवस्थेची समस्या म्हणून पुढे येत आहे.
जानेवारी ते मार्च या कालावधीत बेपत्ता प्रकरणांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे स्पष्ट दिसते. जानेवारी महिन्यात १५० नागरिक बेपत्ता झाले होते. फेब्रुवारीत ही संख्या किंचित घटून १३४ झाली; मात्र मार्च महिन्यात अचानक वाढ होऊन १८४ जण बेपत्ता झाल्याची नोंद आहे. मार्चमधील हा उच्चांक प्रशासनासाठी धोक्याची घंटा मानला जात आहे.
नसरापूर, पर्वतीनंतर आता अकोल्यातील अत्याचार प्रकरण समोर; 60 वर्षीय नराधमाचा बालिकेवर अत्याचार
एकूण २६६ महिलांपैकी १३४ महिलांचा शोध लागला असला तरी अजूनही १३२ महिला बेपत्ता आहेत. सापडलेल्या आणि न सापडलेल्या महिलांची संख्या जवळपास समान असल्याचे चित्र दिसत आहे. हे प्रमाण अत्यंत चिंताजनक असून महिलांच्या सुरक्षेबाबतच्या उपाययोजनांची परिणामकारकता प्रश्नांकित होत आहे. त्यामुळे महिला बेपत्ता होण्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.
बेपत्ता होणाऱ्यात अल्पवयीन मुलींचाही मोठा वाटा या तीन महिन्यांत ३० मुलगे आणि ४६ मुलीच्या अपहरणाच्या घटना नोंदल्या गेल्या. त्यापैकी २५ मुलगे आणि ३४ मुली सापडल्या असल्या, तरी काही मुली अजूनही बेपत्ता आहेत. एकत्रित आकडेवारीनुसार ७१ मुली अद्याप सापडलेल्या नाहीत. अल्पवयीन मुलीचे हे वाढते प्रमाण अधिकच गंभीर मानले जात असून, पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मार्चअखेरपर्यंत १२ मुले आणि ७१ मुली बेपत्ता असल्याची नोंद आहे. दीर्घकाळ प्रलंबित राहिलेल्या या प्रकरणांमुळे तपास अधिक गुंतागुंतीचा बनत आहे. पोलिस यंत्रणांवर प्रचंड ताण निर्माण झाला असून, या प्रकरणांचा छडा लावणे मोठे आव्हान ठरत आहे.