
'त्या' पोलिसांचे मुख्य आरोपीला शेकडो कॉल्स! विषारी दारू कांडप्रकरणी चौकशीतून धक्कादायक माहिती उघड
पुणे : फुगेवाडी, हडपसर तसेच काळेपडळ परिसरात विषारी दारू पिऊन मृत्यू झाल्याप्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुणे ग्रामीणमधील त्या निलंबित चार पोलिसांचे मुख्य आरोपी राधेश्याम प्रजापतीला शेकडो कॉल्स झाले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता प्रजापतीच्या अवैध व्यवसायाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले होते का, अथवा पोलिसांचाच छुपा पाठिंबा होता का, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी दारू पिल्याने २२ हून अधिक जणांचा मृत्यू झाला. याप्रकरणाचा तपास सुरू आहे. तपासादरम्यान उरुळी कांचन येथील राधेश्याम हरीराम प्रजापती याला अटक करण्यात आली. त्याच्या चौकशीतून पोलिस दलातील काही कर्मचाऱ्यांशी असलेले संबंध उघडकीस आले आहेत. याप्रकरणी उरुळी कांचन पोलिस ठाण्यातील अजित काळे व सुमित वाघ तसेच यवत पोलिस ठाण्यातील रामदास जगताप व सुभाष डोईफोडे यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण झाले. त्यात प्रजापतीशी वारंवार संभाषण झाल्याचे निष्पन्न झाले.
या संभाषणांचे स्वरूप काय होते, त्यामागे कोणते हितसंबंध होते व अवैध दारू व्यवसायाला संरक्षण दिले जात होते का, याचा आता तपास सुरू आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाचा तपास सीआयडीकडे असून आतापर्यंत ८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. विषारी दारू मृत्यूकांडातील जबाबदारी निश्चित करण्याबरोबरच पोलिस आणि आरोपी यांच्यातील संभाव्य संगनमताचाही तपास सुरू आहे.
तो कर्मचारी आहे तेथेच!
पुणे, पिंपरी-चिंचवड तसेच पुणे ग्रामीण पोलिस दलातील पोलिस कर्मचाऱ्यांसह वरिष्ठ निरीक्षकांना या मृत्यूकांडात जबाबदार धरून त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. पण, तेथील कामकाज पाहणारा तो कर्मचारी अद्यापही आहे तसाच आहे. त्याच्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने पोलिस दलात उलट-सुलट चर्चा सुरू आहे. दुसरीकडे पुणे ग्रामीण पोलिसांनी प्रजापतीशी संपर्क असल्यावरून चार कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली. मात्र, उरुळी कांचन पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षकांची नियंत्रण कक्षात बदली केली. त्यामुळे कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलासा का, असाही सवाल उपस्थित केला जात आहे.