
श्रीरामपूर गोळीबार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; एका रात्रीत दोघांच्या आवळल्या मुसक्या
श्रीरामपूर : श्रीरामपूर शहराच्या वॉर्ड क्रमांक ७ मधील पूर्णवादनगर परिसरात भरदिवसा झालेल्या गोळीबार आणि प्राणघातक हल्ल्याच्या घटनेने हादरलेल्या श्रीरामपूर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी चोविस तासांच्या आतच अभय सुरेश ससाणे (वय २२, रा. आझाद वाडी, श्रीरामपूर) या मुख्य आरोपीसह अक्षय किरण कपोते (वय २०, रा. म्हाडा कॉलनी, श्रीरामपूर) या दोघांना अटक केली आहे. या घटनेत एकूण ६ आरोपींचा सहभाग असून, उर्वरित ४ आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.
गुरूवार २ जुलै रोजी दुपारी दोन टोळ्यांमधील जुन्या वैमनस्यातून पूर्णवादनगर चौकात शुभम यादव ऊर्फ कल्लू (वय २५) याच्यावर गोळीबार करून चाकूने सपासप वार करण्यात आले होते. हल्लेखोरांपासून जीव वाचवण्यासाठी रक्तबंबाळ अवस्थेत शुभम एका बंगल्यात शिरला होता. या प्रकाराने संपूर्ण परिसरात दहशत निर्माण झाली होती. या धक्कादायक घटनेमुळे श्रीरामपूर शहर ‘क्राईम हब’ बनत असल्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
पोलिस प्रशासनाची धडक कारवाई
घटनेचे गांभीर्य ओळखून अतिरिक्त पोलिस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे आणि उपअधीक्षक जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहरचे पोलिस निरीक्षक विशाल खैरे व स्थानिक शानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोघांना अटक केली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी अभय ससाणे आणि अक्षय कपोते या दोघांना ओळखले.
जखमी शुभम यादवची प्रकृती चिंताजनक
हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शुभम यादववर सध्या अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती अद्यापही अत्यंत चिंताजनक आहे. पोलिस निरीक्षक विशाल खैरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम सध्या जबाब देण्याच्या स्थितीत नाही.
तपासाची चक्रे फिरली
या प्रकरणात सहभागी असलेल्या उर्वरित ४ आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी ४ पथके विविध ठिकाणी रवाना केली आहेत. टोळीयुद्धामुळे घडलेल्या या गंभीर घटनेतील सर्व आरोपींना लवकरच अटक केली जाईल, असा विश्वास पोलिस निरीक्षक खैरे यांनी व्यक्त केला. भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, पोलिस आता कठोर कारवाईच्या पवित्र्यात आहेत.