
साक्षीदार होण्याच्या प्रयत्नात फसला, 'त्या' तरुणाच्या खुनाचा लागला छडा; दोघांना ठोकल्या बेड्या
वैजापूर : वैजापूर तालुक्यातील बेलगाव-वैजापूर मार्गावर आढळलेल्या अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे गूढ उकलले असून, स्वतःला साक्षीदार म्हणून सादर करण्याचा प्रयत्न करणारी व्यक्तीच पोलिस तपासात आरोपी म्हणून समोर आली आहे. राजस्थानातील निंबाला गावचा रहिवासी सीताराम छगन बावरी याच्या खूनप्रकरणी ऋषिकेश अजय त्रिभुवन (वय २३, रा. बेलगाव, ता. वैजापूर) आणि राहुल पप्पू कुंभारकर (वय १८, पोटे गल्ली, वैजापूर) यांना अटक करण्यात आली आहे.
पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, १५ जूनच्या रात्री १२ वाजण्याच्या सुमारास बेलगाव रस्त्यावर तिघे एकमेकांसमोर आले. तिघेही मद्यधुंद अवस्थेत होते. सीताराम कथितपणे शिवीगाळ करत होता. त्यावेळी ऋषिकेशला त्या शिव्या आपल्यालाच उद्देशून दिल्या जात असल्याचा संशय आला. काही क्षणांतच शाब्दिक वादाचे रूपांतर हिंसाचारात झाले.
तोंडात कापड, कचऱ्याचा बोळा कोंबला
आरोपींनी सीतारामच्या डोक्यावर आणि पोटावर लाकडाने वार केल्याचा आरोप आहे. मारहाण इतकी गंभीर होती की, तो गंभीर जखमी होऊन जमिनीवर कोसळला. सूत्रांच्या माहितीनुसार, सीताराम जखमी अवस्थेत पडलेला असतानाही आरोपींचा संताप शांत झाला नाही. त्याला जवळील निर्जनस्थळी नेऊन पुन्हा मारहाण करण्यात आली. तपासात असेही समोर आले आहे की, तो बेशुद्ध अवस्थेत असताना त्याच्या तोंडात कापड व कचऱ्याचा बोळा कोंबण्यात आला त्यानंतर त्याच्या अंगावर वाळलेले गवत टाकून त्याला पेटवून दिल्याचा आरोप आहे. खून केल्यानंतर आरोपींनी मृतकाच्या खिशातील साडेतीनशे रूपये काढून घेतले.
आरोपीची खेळी आरोपीच्याच अंगलट!
आरोपी ऋषिकेशने घटनेनंतर स्वतःवरील संशय दूर करण्यासाठी वेगळाच डाव आखला होता. त्याने रात्री गावातील काही लोकांना फोन करून बेलगाव रोडवर भांडण सुरू असल्याची माहिती दिली होती. त्यामुळे स्वतःला घटनेचा प्रत्यक्षदर्शी किंवा माहिती देणारा व्यक्ती म्हणून दाखवण्याचा त्याचा प्रयत्न होता. मात्र तपास जसजसा पुढे सरकत गेला तसतशी संपूर्ण कहाणी बदलत गेली. पोलिसांना मिळालेल्या तांत्रिक पुराव्यांमुळे आणि चौकशीत समोर आलेल्या तथ्यांमुळे संशयाची दिशा बदलली. अखेरीस स्वतःला साक्षीदार म्हणून सादर करण्याचा प्रयत्न करणारी व्यक्तीच पोलिस तपासात आरोपी म्हणून समोर आली.
घटनास्थळी सापडलेल्या मोबाईलने झाला उलगडा
पोलिस सूत्रांच्या मते, या घटनेमागे केवळ राग नव्हता, तर मृताची ओळख नष्ट करण्याचाही प्रयत्न करण्यात आला होता. मृतदेहाचा चेहरा मोठ्या प्रमाणात जळालेला होता आणि अंगावर कपडेही नव्हते. त्यामुळे सुरुवातीच्या तपासात मृताची ओळख पटविणे अत्यंत कठीण झाले होते. मात्र घटनास्थळाजवळ सापडलेला मोबाईल फोन हा या तपासातील सर्वात महत्त्वाचा धागा ठरला. त्या मोबाईलच्या आधारे पोलिस मृत व्यक्तीपर्यंत पोहोचले. त्यानंतर तांत्रिक पुरावे, स्थानिक माहिती आणि चौकशीच्या आधारे पोलिस आरोपींपर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाले.