
बनावट पदव्यांचा मास्टरमाईंड ताब्यात, नागपूर येथून केली अटक; महत्त्वाच्या बाबी उघड होण्याची शक्यता
चंद्रपूर : नामांकित विद्यापीठांच्या बनावट पदव्या, गुणपत्रिका आणि स्थलांतर प्रमाणपत्रे तयार करून त्यांची लाखो रुपयात विक्री केल्याच्या प्रकरणात दुर्गापूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील कथित मास्टरमाइंड परिमल गौरकर आणि त्याच्या एका साथीदाराला शुक्रवारी सकाळी नागपूर येथील एका घरातून ताब्यात घेण्यात आले आहे. गौरकरच्या अटकेमुळे या बनावट प्रमाणपत्रांच्या रॅकेटशी संबंधित अनेक महत्त्वाच्या बाबी उघड होण्याची शक्यता आहे.
या प्रकरणातील बनावट पदवी व गुणपत्रिकांची पाच ते दहा लाख रुपये किमतीत विक्री केली जात असल्याची माहिती पोलिस तपासातून समोर आली आहे. विशेषतः शासकीय नोकरी मिळविण्यासाठी तसेच नोकरीतील पदोन्नतीसाठी या बनावट शैक्षणिक कागदपत्रांचा वापर केला जात असल्याचा आरोप आहे. चंद्रपूर येथील वैभव माशीरकर यांनी या प्रकरणाची तक्रार दुर्गापूर पोलिसांकडे केली होती. तक्रारीची दखल घेत दुर्गापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष शेगावकर आणि पोलिस उपनिरीक्षक रवींद्र नक्कनवार यांनी तपासाला सुरुवात केली. तांत्रिक माहिती तसेच उपलब्ध पुराव्यांच्या आधारे तपासाचा पाठपुरावा करत पोलिसांनी आरोपींपर्यंत पोहोचण्यात यश मिळविले. या प्रकरणात यापूर्वी वैभव सोनुले या तरुणाला अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता परिमल गौरकर आणि त्याच्या साथीदाराला अटक झाल्याने या प्रकरणातील अटक आरोपींची संख्या तीन झाली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, कथित मास्टरमाइंड गौरकर आणि यापूर्वी अटक करण्यात आलेला सोनुले हे दोघेही नातेवाईक आहेत. त्यामुळे या दोघांमध्ये बनावट प्रमाणपत्रांच्या निर्मिती आणि विक्रीसंदर्भात नेमका काय संबंध होता? याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. गौरकरला या प्रकरणातील कथित मास्टरमाइंड मानले जात असल्याने त्याच्या चौकशीतून बनावट पदवी प्रमाणपत्रांच्या संपूर्ण साखळीचा उलगडा होण्याची शक्यता आहे. प्रमाणपत्रे तयार करणारे, ती खरेदी करणारे, मध्यस्थ आणि त्यांचा शासकीय कामकाजात वापर करणारे यांच्यापर्यंत तपास पोहोचण्याची शक्यता आहे. पोलिसांच्या पुढील तपासात या रॅकेटमध्ये आणखी किती जण सहभागी आहेत? किती बनावट प्रमाणपत्रे तयार करण्यात आली आणि त्यातून किती रुपयांची उलाढाल झाली? हे स्पष्ट होणार आहे.
अनेक विद्यापीठांच्या नावाने बनावट कागदपत्रे
आरोपी गौरकर याने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, गोंडवाना विद्यापीठ यांसह कोल्हापूर, सोलापूर तसेच राजस्थान आणि कर्नाटकातील विविध विद्यापीठांच्या नावाने बनावट पदव्या व गुणपत्रिका तयार केल्याचा आरोप आहे. या कागदपत्रांची निर्मिती कशी केली जात होती? त्यासाठी कोणते तंत्रज्ञान किंवा साधने वापरली जात होती ? बनावट प्रमाणपत्रे तयार करण्यासाठी आवश्यक माहिती आरोपींना कोठून मिळत होती आणि ही कागदपत्रे कोणकोणाला विकण्यात आली, याचा तपास सध्या सुरू आहे.
शासकीय यंत्रणेत बनावट कागदपत्रांचा वापर ?
या रॅकेटचा सर्वाधिक गंभीर पैलू म्हणजे बनावट शैक्षणिक कागदपत्रांचा शासकीय नोकरी आणि पदोन्नतीसाठी वापर झाल्याचा आरोप. त्यामुळे या प्रमाणपत्रांच्या आधारे नोकरी किंवा पदोन्नती मिळविणाऱ्या व्यक्तींची संख्या किती आहे? त्यातील किती प्रमाणपत्रे बनावट आहेत आणि संबंधित शासकीय विभागांमध्ये त्यांचा वापर झाला आहे का? याचा तपास महत्त्वाचा ठरणार आहे.