
न्याय मिळेपर्यंत अंत्यसंस्कार नाही! 9 दिवसांनंतरही ट्विशा शर्माचे केले नाही अंत्यसंस्कार, पोलिसांनी कुटुंबाला पत्र पाठवत केली अपील
उत्तर प्रदेशच्या नोएडा येथील रहिवाशी ट्विशा शर्माचं लग्न मध्य प्रदेशच्या भोपाळ येथील वकिल समर सिंह याच्याशी करण्यात आले होते. माहितीनुसार, समर सिंह हा माजी न्यायाधिश गिरिबाला सिंह यांचा मुलगा आहे. लग्नात ट्विशाच्या कुटुंबियांनी वर पक्षाला भरगच्च हुंडा दिला पण तरीही लग्नानंतर तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला जात होता. याच छळाला कंटाळून तिने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. लग्नाच्या अवघ्या ५ महिन्यांतच ट्विशाने आपले आयुष्य संपवले ज्यानंतर ही घटना देशभर चांगलीच रंगली.
सोशल मिडियावर ट्विशाचे चॅट्स देखील व्हायरल झाले ज्यात ती तिला होणाऱ्या त्रासाचे वर्णन करताना दिसली. इतकं सगळं होऊनही पोलिसांनी आरोपींना ताब्यात का घेतलं नाही असा सवाल कुटुंबियांनी केला आहे. पोलिस घटनेचा तपास करत असून त्यांनी अलिकडेच पत्राद्वारे ट्विशाच्या कुटुंबियांना आवाहन केला आहे. यात त्यांनी काय म्हटलंय ते जाणून घेऊया.
काय आहे पत्रात…
पोलिसांनी ट्विशा शर्माच्या कुटुंबीयांना तिचा मृतदेह शवागारातून ताब्यात घेण्याचे आवाहन केले आहे. पत्रात पोलिसांनी म्हटले आहे की, त्यांची मुलगी ट्विशाचा मृतदेह इथे सडत आहे, कृपया त्याला मोर्चरीतून घेऊन जावे. वास्तविक १८ मे रोजी भोपाळच्या एम्सकडून पोलिसांना एक पत्र लिहिण्यात आले होते ज्यात म्हटलं होतं की, ट्विशा शर्माच्या मृतदेहाचे विघटन रोखण्यासाठी तो ८० अंश सेल्सिअस तापमानात ठेवणे आवश्यक आहे, जी सुविधा मोर्चरीत उपलब्ध नाही. यामुळेच पोलिसांनी पत्र लिहित ही माहिती ट्विशाच्या कुटुंबियांपर्यंत पोहचवली आहे. पत्रात पुढे लिहिलं होतं की, त्यांना रीपोस्टमार्टम करायला कोणतीही आपत्ती नाहीये पण बऱ्याच काळापासून शव मोर्चरीत असल्याने तो डीकंपोज होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळेच शवाला घेऊन जाण्यासाठी ही अपील केली गेली आहे.
रीपोस्टमार्टमवर काय म्हणाले
कुटुंबियांनी ट्विशाच्या मृतदेहाचे योग्य प्रकारे रीपोस्टमार्टम करण्याची विनंती केली होती. यावर पोलिसांनी म्हटले की, “आम्ही याची परवानगी देऊ शकत नाही. याची अनुमती फक्त कोर्ट देऊ शकतं. दुसऱ्या शवविच्छेदनाला आमचा कोणताही आक्षेप नाही, परंतु केवळ न्यायालयच परवानगी देऊ शकते. जर न्यायालयाने परवानगी दिली, तर दुसरे शवविच्छेदन निश्चितपणे केले जाईल.”
आरोपी फरार
पोस्टमार्टम रिपोर्टनुसार, ट्विशाने बेल्टने गळफास लावून घेतला होता ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. दुसरीकडे, ट्विशाचा नवरा समर सिंह ज्याच्यावर तिच्या मृत्यूचा आरोप लावण्यात आला आहे तो सध्या फरार असल्याची माहिती आहे. पोलिस त्याचा तपास करत असून त्याच्यावोरोधात लुकआउट नोटिस (Lookout Circular) जारी करण्यात आली आहे.