
रेतीघाटाच्या वादातून तरुणाची हत्या; तलवारीसह इतर हत्याराने केला हल्ला अन्...
हिंगणघाट : हिंगणघाट तालुका आणि चंद्रपूरच्या वरोरा तालुक्याच्या सीमेवरील रेतीघाटात रेतीघाटाच्या सीमावादातून सिनेस्टाईल हाणामारी झाली. यात तिघे जखमी झाले, तर पुलगाव येथील भाजप शहर महामंत्री भारत नागपाल यांचा मृत्यू झाला. होळीच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती.
चंद्रपूर जिल्ह्यात येणाऱ्या बाबर्डा रेतीघाट आणि वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यात येणारा ढिवरी पिपरी रेतीघाट नदीच्या मधातून विभागला गेला आहे. भारत नागपाल यांच्या मालकीच्या रेतीघाट हद्दीत आरोपींनी शिरून रेतीचा उपसा बोट, पोकलँडच्या सहाय्याने सुरू केला होता. मागील वर्षी बाबर्डा रेतीघाट नागपाल व वानखेडे यांनी घेतला होता. यावर्षी तो आरोपींना दिला. या रेतीघाटातील व्यवहारात १ कोटी रुपये देवाण-घेवाणचा वाद होता. आरोपी व मृत नागपालच्या साथीदारांत फोनवर शाब्दिक बाचाबाचीही झाली होती. आम्ही घाटावर आहो, येथे या, बोलणे करू असे सांगण्यात आले. त्यानंतर आरोपी सौरभ ठाकूर हा आपल्या २०-२५ साथीदारांसह घाटात आला.
तर नागपाल व त्याचे साथीदार पंकज वानखेडे, अमोल ठोंबरे, अमित साहू व अन्य चारचाकी गाडी घाटात नदीपात्राच्या बाजूला उभी करून नदी पात्र शेजारी होते. दरम्यान, आलेल्यांची गाडी सहज निघू नये म्हणून आरोपींनी रस्त्यावर पोकलँड मशीन उभी करून रस्ता अडविला. तर काही कळण्यापूर्वीच नागपाल, त्याच्या साथीदारावर आरोपींकडून हल्ला चढविला. यात भारतचा मृत्यू झाला.
दरम्यान, हा हल्ला होताच नागपाल याच्या साथीदारांनी पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, झटापटीत अमित साहू, पंकज वानखेडे, अमित ठोंबरे यांनाही दुखापत झाली. मारेकऱ्यांनी तलवार व इतर शस्त्राने भारत यांना मारहाण करून त्यास नदीच्या पाण्यात फेकून पळ काढल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. घटनेनंतर रेतीघाटात संतप्तांनी उभ्या जेसीबीची तोडफोड केली. याशिवाय तेथे उभ्या असलेल्या काही वाहनांचीही तोडफोड करण्यात आल्याने काहीकाळ तेथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. माहिती मिळताच वरोरा, हिंगणघाट, वडनेर आदी ठिकाणच्या पोलिसांची चमू घटनास्थळी पोहोचली.
तोंड दाबून खून केला
या प्रकरणातील आरोपींनी भारत नागपाल याच्यावर पहिला हल्ला केला. तर नंतर नदीच्या पाण्यात भारतचे तोंड दाबून त्यास ठार केले. त्यानंतर मृतदेह नदी पात्रात फेकून पळ काढला. आरोपी वर्धेच्या दिशेने पळ काढत असल्याची माहिती मिळाल्यावर दारोडा टोल प्लाझावर वडरेन पोलिसांनी कार अडवून आरोपी सौरभ ठाकूर व काही आरोपींना ताब्यात घेत वरोरा पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणातील दोन आरोपी फरार असल्याचे सांगण्यात येते.
हेदेखील वाचा : Uttar Pradesh Crime: सामूहिक हत्याकांड! तरुणाने आपल्याच कुटुंबातील चार जनाची कुऱ्हाडीने केली हत्या; कारण काय?