फोटो सौजन्य - Social Media
अशामध्ये मयंकच्या वडिलांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मागणी केली आहे की मयंकचा हत्यारा रोशन सुवर्णा याला फासी झालीच पाहिजे तरच मयंकला न्याय मिळेल. विविध क्षेत्रातून अशा मागण्या येत आहेत. दरम्यान, सुप्रसिद्ध अभिनेत्री आंचल खुरानाने या संबंधित पोस्ट करत तिचे म्हणणे शेअर केले आहे. आंचल म्हणते की, “मुंबई म्हणजे सगळ्यात सुरक्षित शहर! या शहराचं नाव ऐकून माझ्या आईवडिलांनी मला कसलाही विचार न करता मुंबईला पाठवून दिले. का? कारण त्यांना आणि मला वाटत होतं की मुंबई हे सुरक्षित शहर आहे.” मयंक लोहार प्रकरणाविषयी सांगताना ती म्हणते की, “मयंक नावाच्या मुलाला लोकल ट्रेनमध्ये एका नराधमाने चाकूने हल्ला करत ठार केला. यावेळी लोकलच्या त्या डब्यामध्ये अनेक प्रवासी हजर होते. परंतु, त्यातील एकानेही मयंकला वाचवण्याची हिमंत किंवा प्रयत्न केले नाही. सगळ्यांनी एकत्र येऊन त्या नराधमाला थांबवू शकले असते पण कुणीही पुढे आले नाही, याउलट ती लोकं रीला बनवत बसले. शूट करत बसले.”
पुढे आंचल म्हणते की, “कुणाला मारण्याचा विचार जरी केला तरी फाटून हातात येते. आजकाल ही लोकं अशा कोणत्या फ्रस्ट्रेशनमध्ये घराबाहेर पडतात की बिनधास्त मोकाट खून करू लागतात.” या पोस्टखाली आंचलने भलेमोठे कॅप्शन देत नमूद केले आहे की, “तुम्ही दार बंद करा, पावसाचे पाणी आत येत आहे, एवढीच एका तरुणाची विनंती होती. त्यात वाद नव्हता, अपमान नव्हता, कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता. पण त्या एका क्षुल्लक कारणामुळे त्याला स्वतःचा जीव गमवावा लागला. आजचा सर्वात मोठा प्रश्न हा नाही की हल्लेखोराच्या हातात चाकू का होता. प्रश्न हा आहे की आपल्यातील संयम इतका का संपत चालला आहे? एखाद्या साध्या मतभेदाचं रूप इतक्या टोकाच्या हिंसेत कसं बदलतं? आपण अशा काळात जगतो आहोत जिथे अहंकाराला माणुसकीपेक्षा जास्त महत्त्व दिलं जात आहे. क्षणिक राग, दुखावलेला स्वाभिमान किंवा छोटासा वाद यासाठी लोक दुसऱ्याचा जीव घेण्याइतके आक्रमक होत आहेत. या घटनेत एका आईचा आधार हिरावला गेला, एका वडिलांचे स्वप्न उद्ध्वस्त झाले आणि एका कुटुंबाचे संपूर्ण आयुष्य बदलून गेले. एका चुकीच्या निर्णयाची किंमत अनेकांना मोजावी लागली. खरी ताकद राग दाखवण्यात नसते, तर रागावर नियंत्रण ठेवण्यात असते. मतभेद स्वीकारणे, शांत राहणे आणि परिस्थिती समजून घेणे हेच खरे सामर्थ्य आहे. कारण रागाचा एक क्षण केवळ एक आयुष्य संपवत नाही, तर अनेक लोकांची स्वप्ने, आशा आणि भविष्य कायमचे बदलून टाकतो.”






