
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Jai Jai Swami Samarth Serial : कलर्स मराठीवरील लोकप्रिय आणि भक्तिभावाने ओतप्रोत असलेल्या ‘जय जय स्वामी समर्थ‘ मालिकेत प्रेक्षकांना लवकरच एक अलौकिक आणि चमत्कारिक प्रसंग पाहायला मिळणार आहे. जुलै महिना गुरुदर्शनाचा महिना मानला जात असल्याने मालिकेच्या कथानकातही भक्ती आणि श्रद्धेचा अद्भुत संगम अनुभवायला मिळणार आहे.
मालिकेच्या आगामी भागात अक्कलकोटकडे निघालेल्या कावेरीची वाट स्वामींच्या दिव्य लीलेमुळे बदलते आणि ती थेट शिर्डीत पोहोचते. तिथे तिला साक्षात साईबाबांच्या रूपात स्वामी समर्थांचे दर्शन घडते. हा प्रसंग प्रेक्षकांसाठी भक्ती, श्रद्धा आणि अध्यात्माचा विलक्षण अनुभव ठरणार आहे.
शिर्डीतील पवित्र द्वारकामाईमध्ये पहाटेच्या मंगलमय वातावरणात धूनीसमोर बसलेले साईबाबा कावेरीला दिसतात. यावेळी एक चमत्कारिक घटना घडते. स्वामी धूनीतील जळते लाकूड कावेरीच्या हातावर ठेवतात. मात्र, तिच्या हाताला कोणतीही इजा होत नाही. उलट तिच्या हातावर दिव्य प्रकाशात गुरुमंत्रातील ‘द्रां’ हे अक्षर प्रकट होते. कावेरीला शिर्डीत घेऊन आलेला तरुण साईबाबांमध्ये विलीन होतो आणि स्वामी समर्थ व साईबाबांचे रूप एकरूप होत ‘सबका मालिक एक’ हा संदेश घुमतो.
कावेरीला अक्कलकोटऐवजी शिर्डीत कसे आणले, याचे उत्तर देताना स्वामी म्हणतात, “मी माझ्या चिमणीच्या पायात दोरी बांधून तिला ओढून घेतो,” या वचनाची आठवण करून देतात. त्यानंतर स्वामी आपल्या झोळीतून एक चिठ्ठी काढून कावेरीच्या हाती देतात आणि तिच्यावर एक महत्त्वाची जबाबदारी सोपवतात.
स्वामींनी त्या चिठ्ठीत नेमके काय लिहिले आहे? कावेरी ही जबाबदारी पूर्ण करू शकेल का? गुरुमंत्र पूर्णत्वाला कधी जाणार? या प्रश्नांची उत्तरे मालिकेच्या आगामी भागांमध्ये उलगडणार आहेत.
भक्ती, श्रद्धा आणि गुरुकृपेचा हा अद्भुत सोहळा अनुभवण्यासाठी ‘जय जय स्वामी समर्थ’ मालिका दररोज रात्री ८.१० वाजता कलर्स मराठीवर पाहता येईल.