
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
‘अशक्य ही शक्य करतील स्वामी’ या कथासूत्रावर आधारित हरिप्रियाची ही कहाणी एका अनोख्या श्रद्धेची साक्ष देते. अक्कलकोटमधील हरिप्रिया सुंदर, निरागस आणि अत्यंत भक्तिमय स्वभावाची, स्वामी भक्तीसोबतच लहानपणापासूनच तिला विठोबाचे प्रचंड वेड. मीरासारखी भक्ती तिच्या मनात घर करून बसली आहे आणि म्हणूनच ती ठामपणे म्हणते विठोबाशिवाय ती कोणालाही वरणार नाही. तिच्या या विश्वासामागे केवळ हट्ट नाही, तर भक्तीचा गूढ प्रवास दडलेला आहे.
परिस्थिती मात्र हरिप्रियाच्या विरोधात उभी राहते. घरची आर्थिक अडचण, भावाचा स्वार्थ आणि तिचं जबरदस्तीने ठरवलेलं लग्न, जबरदस्तीच्या लग्नाला हरिप्रियाने होकार द्यावा म्हणून मार्तंडचे भोंदू उपाय या सगळ्यांमध्ये हरिप्रियाचा संघर्ष अधिक तीव्र होतो. परंतु ती स्वामींच्या मार्गदर्शनाने गिव्ह अप करत नाही. तिच्या या भूमिकेला आव्हान देण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात, तिच्या श्रद्धेलाही प्रश्न विचारले जातात. पण याच काळात स्वामींच्या लीलांमुळे तिच्या आयुष्यात काही अनपेक्षित वळणं येऊ लागतात. एका अनयूज्युअल व्यक्तीशी तिची भेट होते. एक असा प्रवास सुरू होतो, जिथे भक्ती, नातं आणि देवत्व यांचा अर्थ नव्याने समोर येऊ लागतो.
कलियुगात देवाशी लग्न करणं खरंच शक्य आहे का, की त्यामागे काही वेगळंच तत्त्व दडलंय? हरिप्रियाची ही कहाणी केवळ एका इच्छेपुरती मर्यादित न राहता श्रद्धेची खरी ताकद उलगडते. स्वामींच्या मार्गदर्शनातून उलगडणारा हा प्रवास प्रेक्षकांना विचार करायला लावतो देव म्हणजे नेमकं काय, आणि ‘अशक्य’ वाटणारं खरंच ‘शक्य’ होऊ शकतं का? पुढे काय घडणार जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये लागून राहिली आहे.