
( फोटो सौजन्य-चॅट जीपीटी)
मराठी टेलिव्हिजन विश्वात टीआरपीच्या शर्यतीत मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे. गेल्या साडेतीन वर्षांपासून स्टार प्रवाहची ठरलं तर मग ही मालिका टीआरपीमध्ये अधिराज्य गाजवत होती. मात्र, या टीआरपीच्या शर्यतीत मोठा बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. ठरलं तर मग या मालिकेला मागे टाकत आता कमळी ही मालिका महाराष्ट्राची नंबर वन मालिका ठरली आहे.
‘कमळी’च्या कथानकातील सातत्याने येणारी नवी वळणं, प्रमुख कलाकारांचा दमदार अभिनय आणि भावनिक प्रसंग यामुळे प्रेक्षकांचा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. याचाच परिणाम म्हणून मालिकेच्या टीआरपीमध्ये लक्षणीय वाढ झाली असून तिने अव्वल स्थान पटकावले आहे. यामुळे कमळीच्या टीमचं संपूर्ण महाराष्ट्रातून भरभरून कौतुक होत आहे. झी मराठीने याबाबत अधिकृत पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे.
या आठवड्यात टीआरपीच्या शर्यतीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. अखेर कमळी या मालिकेने साडे तीन वर्षांचा रेकॉर्ड मोढून काढला आहे. कमळी संपूर्ण महाराष्ट्रातील मराठी मालिकांमध्ये पहिली आली आहे. याबद्दल झी मराठाने या संपूर्ण टीमचं अभिनंदन केलं आहे.
झी मराठीने शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे, “तिने घर केलं प्रत्येकाच्या मनामनांत, ‘कमळी’ ठरली एक नंबर संपूर्ण महाराष्ट्रात! ३.८ TVR सह मराठी मालिकांमध्ये कमळीचा नंबर पहिला.” या घोषणेनंतर मालिकेच्या चाहत्यांकडून सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला जात आहे.
. झी मराठीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टनंतर चाहत्यांनी कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पाडला आहे.नेटकऱ्यांनी “वाह मस्त…”, “आले शंभर… गेले शंभर… कमळी ठरली एक नंबर”, “नंबर वन म्हणजे… ‘ठरलं तर मग’ला मागे टाकून ‘कमळी’ने करून दाखवलं”, “वाह! याला म्हणतात टीआरपी” अशा उत्स्फूर्त प्रतिक्रिया देत मालिकेच्या यशाचं कौतुक केलं आहे.
या मालिकेत अभिनेत्री विजया बाबर मुख्य भूमिकेत झळकत असून, त्यांच्यासोबत ईला भाटे, निखिल दामले, केतकी कुलकर्णी, सुषमा मुरुडकर आणि आशा शेलार महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत.