
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली ‘दीपज्योती’ मालिका सध्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचली आहे. अनेक अडथळे, गैरसमज आणि संघर्षांचा सामना करत अखेर प्रीती आणि स्वराज यांचा विवाहसोहळा पार पडला. दीप आणि ज्योती यांनी सर्व संकटांवर मात करत हे लग्न यशस्वीरीत्या घडवून आणलं. त्यामुळे आता सर्व काही सुरळीत होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, लग्नानंतर लगेचच प्रीतीच्या एका अटीमुळे घरात नव्या वादळाची चाहूल लागली आहे.
गृहप्रवेशाच्या वेळी प्रीती सर्वांसमोर एक अनपेक्षित अट ठेवते. ती स्पष्टपणे सांगते की, “सुभद्रा आई माझ्यासोबत असेल तरच मी या घरात प्रवेश करेन, अन्यथा नाही.” तिच्या या भूमिकेमुळे घरातील सर्वजण अवाक होतात. लग्नाचा आनंद साजरा होत असतानाच नव्या वादाची ठिणगी पडते आणि दीप-ज्योतीसमोर आणखी एक मोठं आव्हान उभं राहतं.
प्रीतीच्या या निर्णयामुळे घरातील वातावरण पुन्हा एकदा तणावपूर्ण होणार आहे. तिची अट मान्य केली जाईल का? सुभद्रा तिच्यासोबत गृहप्रवेश करणार का? आणि या नव्या पेचातून दीप व ज्योती कसा मार्ग काढणार? या प्रश्नांची उत्तरं आगामी भागांमध्ये मिळणार आहेत.
दरम्यान, मालिकेत प्रीतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मानसी सुभाष हिने लग्नसोहळ्याच्या शूटिंगचा अनुभव शेअर केला. ती म्हणाली, “प्रीती आणि स्वराजचं लग्न खूप सुंदर आणि भव्य पद्धतीने चित्रित करण्यात आलं आहे. शूटिंग करतानाही तो सोहळा अगदी खऱ्या लग्नासारखा वाटत होता. फेरे घेताना मला माझ्या स्वतःच्या लग्नाचा विचार येत होता. खरं सांगायचं तर त्या क्षणी माझे हातही थोडे थरथरत होते.”
ती पुढे म्हणाली, “लग्नानंतर गृहप्रवेशाच्या वेळी प्रेक्षकांना मोठा ड्रामा पाहायला मिळणार आहे. प्रीतीची अट आणि त्यानंतर घडणाऱ्या घटना कथानकाला वेगळं वळण देणार आहेत. त्यामुळे पुढे काय होणार याची उत्सुकता नक्कीच वाढेल.”
लग्नसोहळा संपला असला तरी प्रीतीच्या या एका निर्णयामुळे ‘दीपज्योती’ मालिकेत आता नव्या संघर्षाची सुरुवात होणार आहे. त्यामुळे आगामी भागांमध्ये प्रेक्षकांना भरपूर नाट्य आणि अनपेक्षित घडामोडी पाहायला मिळणार आहेत.