
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया )
चित्रपटसृष्टीत सध्या सुरक्षित आणि फॉर्म्युलाबद्ध विषयांना अधिक प्राधान्य दिले जात असताना, निर्माता निखिल द्विवेदी यांनी ‘बंदर’सारख्या धाडसी आणि विचार करायला भाग पाडणाऱ्या चित्रपटाला पाठिंबा देत वेगळी वाट निवडली आहे. त्यामुळे हा चित्रपट यंदाच्या सर्वाधिक चर्चेत आणि कौतुकास पात्र ठरलेल्या चित्रपटांपैकी एक मानला जात आहे.
बॉबी देओल अभिनीत आणि अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘बंदर’ हा केवळ मनोरंजनासाठी बनवलेला चित्रपट नाही. उलट, तो समाजातील आणि व्यवस्थेतील अशा वास्तवांवर प्रकाश टाकतो, ज्यांकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. चित्रपटाची कथा समर या एकेकाळच्या लोकप्रिय अभिनेत्याभोवती फिरते, जो आपल्या घटत्या लोकप्रियतेशी आणि वैयक्तिक संघर्षांशी झुंज देत असतो.
बॉबी देओल ने या चित्रपटात त्याच्या कारकिर्दीतील सर्वात प्रभावी अभिनयांपैकी एक सादर केला असल्याचे म्हटले जात आहे. तर अनुराग कश्यप याने त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण रॉ आणि वास्तववादी कथनशैलीमुळे चित्रपटाला अधिक धार दिली आहे. मात्र, इतक्या वेगळ्या आणि जोखमीच्या विषयाला पाठिंबा देणारा निर्माता नसता, तर हा चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचणे कठीण झाले असते.
‘बंदर’ची कथा खोट्या आरोपांमध्ये अडकलेल्या एका व्यक्तीच्या संघर्षाभोवती फिरते. न्यायव्यवस्थेची कार्यपद्धती, तुरुंगातील कठोर वास्तव आणि संस्थात्मक त्रुटी यांसारखे संवेदनशील विषय चित्रपटात कोणतीही तडजोड न करता मांडण्यात आले आहेत. हे विषय प्रेक्षकांना अस्वस्थ करू शकतात, मात्र त्यावर चर्चा होणे तितकेच आवश्यक असल्याचे चित्रपटातून अधोरेखित केले जाते.
निखिल द्विवेदी यांनी गेल्या काही वर्षांत वेगळ्या, महत्त्वाकांक्षी आणि आशयघन कथांना पाठिंबा देणारे निर्माता म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. ‘बंदर’च्या माध्यमातून त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की ते केवळ मनोरंजनासाठी नव्हे, तर समाजाला विचार करायला भाग पाडणाऱ्या सिनेमासाठीही उभे आहेत.
ज्या काळात सुरक्षित विषय आणि ठरावीक फॉर्म्युल्यांवर आधारित चित्रपटांना अधिक पसंती मिळते, त्या काळात ‘बंदर’ हा निर्भय चित्रपटनिर्मितीचे उदाहरण म्हणून पुढे आला आहे. सामाजिक वास्तवावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या आणि प्रेक्षकांना आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडणाऱ्या अशा कथांना पाठिंबा देण्याचा निखिल द्विवेदी यांचा निर्णय त्यांच्या दूरदृष्टीचा आणि सिनेमावरील विश्वासाचा पुरावा मानला जात आहे.