नितीश कुमार नसतील बिहारचे नवे मुख्यमंत्री? पंतप्रधान मोदींचे सूचक विधान
Bihar Assembly Election Result: बिहार विधानसभा निवडणुकीतील भाजप आणि जेडीयुच्या विजयानंतर आता बिहारमध्ये मुख्यमंत्री कोण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या वीस वर्षांपासून बिहारमध्ये नितीश कुमार यांची सत्ता होती. यंदाच्या निवडणुकादेखील नितीश कुमार यांच्या नेतृत्त्वात लढवण्यात आल्या होत्या. विधानसभा निवडणुकीच्या निकालात भाजपला ८९ जागा मिळाल्या तर नितीश कुमार यांच्या जेडीयूला ८५ जागा मिळाल्या.
बिहार निवडणुकांनंतर आता बिहारचा नवा मुख्यमंत्री कोण होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या पुढील मुख्यमंत्र्यांबाबत एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. बिहारमध्ये आता भाजपचा मुख्यमंत्री असेल. त्यांनी हे विधान एका निवडणूक सभेत केल आहे. नितीश कुमार हे बऱ्याच काळापासून बिहारचे मुख्यमंत्री आहेत. आता बिहारमधील जनता त्यांचा नेता कोणाला निवडते हे पाहायचे आहे. असं पंतप्रधान मोदी यांनी एका निवडणूक सभेत म्हटलं होतं.
बिहारमध्ये एनडीएच्या प्रचंड विजयानंतर, पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याबद्दल महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. पंतप्रधान मोदींनी एनडीएच्या विजयाचे वर्णन “सुशासनाचा विजय” असे केले आहे. हे विधान नितीश कुमार यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या सततच्या कार्यकाळाचे समर्थन म्हणून पाहिले जात आहे.
बिहारमध्ये एनडीएच्या प्रचंड विजयानंतर, मोदींनी इंस्टाग्रामवर पोस्ट केली आहे “नितीश त्यांच्या समर्थकांमध्ये ‘सुशासन बाबू’ म्हणून लोकप्रिय आहेत आणि गेल्या २० वर्षांत कायदा आणि सुव्यवस्था आणि विकास सुधारून बदल घडवून आणल्याचा दावा करतात. हा बिहारच्या विकासाचा विजय आहे. जनहिताच्या भावनेचा विजय आहे.” सामाजिक न्याय जिंकला आहे.’ अशा शब्दांत त्यांनी कौतुक केलं आहे.
बिहार निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या पुढील कार्यकाळाबाबतही प्रतिक्रिया देण्यात आल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “मी सर्व एनडीए नेत्यांचे त्यांच्या उत्कृष्ट कामाबद्दल आणि मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्या नेतृत्वाबद्दल अभिनंदन करतो.” त्याच वेळी त्यांनी भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आल्याचेही नमूद केले. यावेळी जाहीर झालेल्या निकालांमध्ये भाजपने ८९, जेडीयूने ८५, एलजेपी (आर) ने १९, एचएएमने ५ आणि आरएलएमने ४ जागा जिंकल्या. निकालानंतर विरोधकांकडून असा दावा सातत्याने करण्यात येत आहे की भाजप, नीतीश कुमार यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवणार नाही.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदू ठरलेले नितीश कुमार पुन्हा एकदा ध्रुवताऱ्यासारखे उदयास आले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी नेत्यांची सतत ये-जा सुरू असून नवीन समीकरणांबाबतच्या चर्चांना अधिक वेग आला आहे. नितीश कुमार आपल्या विश्वासू सहकाऱ्यांसोबत सलग बैठका घेत आहेत. मात्र, बिहारचा पुढील मुख्यमंत्री कोण होणार याबद्दलची अनिश्चितता अद्याप कायमच आहे.
शनिवारी सकाळी चिराग पासवान यांनी नितीश कुमार यांच्या निवासस्थानी भेट दिली. बैठकीनंतर ते म्हणाले, “मी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करण्यासाठी गेलो होतो. आमच्या उमेदवारांना मुख्यमंत्री कार्यालयाकडून पाठिंबा मिळाला आणि आम्हीही अलौलीमधील जेडीयू उमेदवाराला समर्थन दिले,” अशी माहिती त्यांनी दिली. पुढील मुख्यमंत्री कोण होणार, असा प्रश्न विचारला असता चिराग पासवान मात्र मौन बाळगत “या विषयावर सविस्तर माहिती पत्रकार परिषदेत दिली जाईल,” अशी प्रतिक्रीया दिली.






