
नवी दिल्ली – बिहारमध्ये ५ वर्षानंतर नितीश कुमार यांचा पक्ष जेडीयू आणि भाजप यांच्यातील युती पुन्हा तुटली आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जेडीयू खासदार आणि आमदारांच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, JDUच्या बैठकीत नितीश कुमार म्हणाले की, भाजपने नेहमीच आम्हाला कमकुवत करण्याचा प्रयत्न केला. भाजपने माझा अपमान केला. २०१३ पासून आतापर्यंत भाजपने फसवणूक केली आहे.
यादरम्यान नितीश यांनी राज्यपाल फगू सिंह चौहान यांच्या भेटीची वेळ मागितली आहे. थोड्याच वेळात मुख्यमंत्री जेडीयू नेत्यांसह राजभवनात जाणार आहेत. तेजस्वीही त्यांच्यासोबत असतील. राजभवनाजवळ पोलिसांनी बॅरिकेड लावले असून तगडा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. RJD, काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी नितीश सरकारला पाठिंबा देण्यासाठी पत्र तयार केले आहे. दरम्यान, नितीश कुमार हे महाआघाडीचे मुख्यमंत्री असतील, असे काँग्रेसचे आमदार शकील अहमद खान यांनी म्हटले आहे.