
West Bengal Election Violence 2026, Dantan Assembly Constituency, Ajit Kumar Jana Attack,
West Bengal Assembly Election 2026: पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. ही रणधुमाळीने पश्चिम बंगालमधील राजकारण तापायला सुरूवात झाली आहे. मंगळवारी, पहिल्या टप्प्याच्या प्रचाराचा गलबला शांत होत असतानाच, पश्चिम मेदिनीपूर जिल्ह्यातील दांतनमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, प्रचाराच्या शेवटच्या काही तासांत उसळलेल्या या हिंसाचारामुळे संपूर्ण दांतन भागात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दांतन विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या रॅलीमध्ये अचानक रणांगणात बदलले. यामुळे या भागात चांगलाच तणाव निर्माण झाला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, दांतन विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार अजीत कुमार जाना यांच्या समर्थनार्थ हरिपूर येथून मोठी बाईक रॅली काढण्यात आली होती. शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ही रॅली मोहनपूरकडे जात असताना सुरुवातीला सर्व काही सुरळीत होते. मात्र, आंतला परिसरात पोहोचताच आधीपासून दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांच्या गटाने रस्ता अडवला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे रॅलीतील कार्यकर्त्यांना सावरायलाही वेळ मिळाला नाही. प्रत्यक्षदर्शींच्या मते, हल्लेखोरांकडे लाठी-काठ्या आणि धारदार शस्त्रे होती, ज्यांच्या सहाय्याने त्यांनी कार्यकर्त्यांवर हल्ला चढवला.
Kedarnath Dham : ‘हर हर महादेव’च्या गजरात उघडले केदारनाथ धामचे द्वार; मोबाईल वापर अन् रिल्सवर बंदी
या हल्ल्यामागे तृणमूल काँग्रेस समर्थकांचा हात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. हल्लेखोरांनी कार्यकर्त्यांना मारहाण करत अनेक वाहनांचे नुकसान केले. रॅलीतील काही मोटारसायकलींना रस्त्यावरच पेटवून देण्यात आले. जळणाऱ्या वाहनांचा धूर, फुटलेल्या काचा आणि सर्वत्र पसलेला गोंधळ यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेत अजीत जाना यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्या वाहनाचीही तोडफोड करण्यात आली आहे. अचानक झालेल्या या हिंसाचारामुळे नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी धावाधाव केली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागली.
हल्ल्यात जखमी झालेल्या कार्यकर्त्यांना तातडीने मोहनपूर ब्लॉक रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या माहितीनुसार अनेकांना गंभीर दुखापती झाल्या आहेत. त्यापैकी एका कार्यकर्त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून त्याला पुढील उपचारांसाठी ओडिशातील बालासोर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. संबंधित कार्यकर्ता सध्या जीवासाठी झुंज देत आहे. भाजपने विरोधकांवर राजकीय द्वेषातून जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप केला आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन संपूर्ण दांतन परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलिस व केंद्रीय सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहेत. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून फ्लॅग मार्च काढण्यात येत आहे.
या घटनेच्या निषेधार्थ संतप्त भाजप कार्यकर्त्यांनी मोहनपूर पोलीस ठाण्यासमोर एगरा-सोलपाटा राज्य महामार्ग रोखून धरला आणि हल्लेखोरांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. दरम्यान, तृणमूल काँग्रेस ने या सर्व आरोपांना फेटाळून लावले आहे.