हरियाणा : दिल्लीचे मुख्यमंत्री (Delhi CM) व आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी जाहीर सभेमध्ये आपण मागण्या पूर्ण झाल्यानंतर राजकारणातून (Political News) राजीनामा देईल असे सांगितले. जींथ येथील सभेमध्ये भाजपवर (BJP) जोरदार निशाणा साधला आहे. आज भाजपला सर्वात मोठा धोका आम आदमी पक्षाकडून (Aam Aadmi Party) आणि माझ्याकडून असल्याचे देखील अरविंद केजरीवाल म्हणाले आहेत.
भाषणामध्ये आपल्या पाच मागण्या पूर्ण झाल्यास राजकारणामधून बाहेर पडणार असल्याचे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. या पाच मागण्याची यादी अरविंद केजरीवाल यांनी बोलून दाखवली. मागण्याबद्दल बोलताना केजरीवाल म्हणाले, मी राजकारणामध्ये सत्तेसाठी आलो नाही… मी इथे पैसा कमवण्यासाठी किंवा मंत्री किंवा मुख्यमंत्री बनण्यासाठी देखील आलेलो नाही. माझ्या मागण्या पूर्ण केल्या तर मी राजकारण सोडेल असे देखील केजरीवाल यांनी सांगितले.
अरविंद केजरीवाल म्हणाले, “40 कोटी जनतेच्या वतीने माझी पहिली मागणी या देशाची शिक्षण व्यवस्था सुरळीत करण्याची आहे. सर्वांसाठी समान शिक्षणाची व्यवस्था करा. गरीब-श्रीमंत सर्वांना समान शिक्षण मिळाले पाहिजे. दुसरी मागणी म्हणजे संपूर्ण देशातील प्रत्येकाला चांगली वागणूक मिळावी, मग तो गरीब असो वा श्रीमंत. देशभरातील रुग्णालये दुरुस्त करा. तिसरी मागणी म्हणजे ‘महागाई कमी करा. दिल्ली आणि पंजाबमध्ये महागाई कमी करून आम्ही हे दाखवून दिले आहे. देशात महागाईबाबत षडयंत्र सुरू आहे. चौथी मागणी म्हणजे प्रत्येक हाताला रोजगार द्या’ तर पाचव्या मागणीबाबत केजरीवाल म्हणाले की, देशात वीज खूप महाग आहे. जर तुम्ही गरिबांना मोफत वीज दिली आणि संपूर्ण देशातील प्रत्येकाला 24 तास वीज दिली तर मी राजकारण सोडेन,” असे वक्तव्य अरविंद केजरीवाल यांनी केले आहे.






