फोटो सौजन्य - Social Media
भारत निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता, कार्यक्षमता आणि नागरिकांचा विश्वास अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने ‘ईसीआयनेट (ECINET)’ या एकात्मिक डिजिटल प्लॅटफॉर्मचे उद्घाटन केले आहे. इंडिया इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन डेमोक्रसी अँड इलेक्शन मॅनेजमेंट (IICDEM)-2026 या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या निमित्ताने हा महत्त्वाकांक्षी प्लॅटफॉर्म सादर करण्यात आला. २१ ते २३ जानेवारी २०२६ दरम्यान नवी दिल्लीतील भरत मंडपम येथे ही तीन दिवसीय परिषद आयोजित करण्यात आली आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या संकल्पनेतून ‘ईसीआयनेट’ची निर्मिती करण्यात आली असून, निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू आणि डॉ. विवेक जोशी यांच्या सहकार्याने हा प्रकल्प विकसित करण्यात आला आहे. या प्लॅटफॉर्मच्या विकासाची अधिकृत घोषणा मे २०२५ मध्ये करण्यात आली होती.
यावेळी बोलताना मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सांगितले की, ‘ईसीआयनेट’ हा प्लॅटफॉर्म भारतीय संविधान आणि निवडणूकविषयक कायद्यांच्या चौकटीत विकसित करण्यात आला आहे. तो २२ अनुसूचित भाषा तसेच इंग्रजीत उपलब्ध असून, नागरिकांसाठी अधिक सुलभ आणि समावेशक आहे. विविध देशांतील निवडणूक व्यवस्थापन संस्थांनी त्यांच्या स्थानिक कायदे आणि भाषांनुसार अशाच प्रकारचे डिजिटल प्लॅटफॉर्म विकसित करण्यासाठी भारतासोबत सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू यांनी ‘ईसीआयनेट’मुळे निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता वाढेल, निर्णयप्रक्रिया जलद होईल आणि निवडणूक यंत्रणांवरील जनतेचा विश्वास अधिक मजबूत होईल, असे नमूद केले. तर निवडणूक आयुक्त डॉ. विवेक जोशी यांनी या आंतरराष्ट्रीय परिषदेमुळे तंत्रज्ञान आणि डिजिटल नवकल्पनांच्या क्षेत्रातील जागतिक सर्वोत्तम पद्धती समजून घेण्याची संधी निवडणूक संस्थांना मिळणार असल्याचे सांगितले.
माहिती तंत्रज्ञान विभागाच्या महासंचालक डॉ. सीमा खन्ना यांनी सादरीकरण करताना सायबर सुरक्षेला ‘ईसीआयनेट’चा मुख्य आधारस्तंभ असल्याचे स्पष्ट केले. आज तंत्रज्ञान केवळ सहाय्यक साधन न राहता धोरणात्मक सक्षमक बनले असून, या प्लॅटफॉर्ममुळे निवडणूक प्रक्रियेत विश्वासार्हता आणि कार्यक्षमता वाढेल, असे त्यांनी सांगितले.
‘ईसीआयनेट’ हा जगातील सर्वात मोठा निवडणूक सेवा डिजिटल प्लॅटफॉर्म मानला जात असून, भारत निवडणूक आयोगाच्या ४० हून अधिक अॅप्स आणि पोर्टल्सचे यामध्ये एकत्रीकरण करण्यात आले आहे. भारतीय संविधान, लोकप्रतिनिधी अधिनियम १९५० व १९५१, मतदार नोंदणी नियम १९६० आणि निवडणूक आचार नियम १९६१ यांच्याशी पूर्ण सुसंगततेने हा प्लॅटफॉर्म विकसित करण्यात आला आहे.
या प्रणालीद्वारे नागरिक, उमेदवार, राजकीय पक्ष आणि निवडणूक अधिकारी एकाच सुरक्षित डिजिटल व्यासपीठावर जोडले गेले आहेत. मतदार नोंदणी, मतदार यादी शोध, अर्जाची स्थिती तपासणे, उमेदवारांची माहिती, ई-ईपीआयसी डाउनलोड, बीएलओसोबत कॉल बुकिंग, मतदान प्रवृत्ती आणि तक्रार निवारण अशा विविध सेवा येथे उपलब्ध आहेत.
‘ईसीआयनेट’ची बीटा आवृत्ती २०२५ बिहार विधानसभा निवडणुका आणि विशेष सघन पुनरिक्षण प्रक्रियेदरम्यान यशस्वीपणे वापरण्यात आली होती. आतापर्यंत या प्लॅटफॉर्मवरून १० कोटींहून अधिक अर्जांवर प्रक्रिया करण्यात आली असून, दररोज सरासरी २.७ लाख अर्ज हाताळले जात आहेत. ११ लाखांहून अधिक बूथ लेव्हल ऑफिसर्स (बीएलओ) नोंदणीकृत असून, १५० कोटींहून अधिक दस्तऐवजांचे डिजिटायझेशन करण्यात आले असल्याची माहिती भारत निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.






