
भारत पुन्हा लॉकडाउनच्या दिशेने? मोदींचं 'ते' वक्तव्य अन् ...; काय आहे सत्य? (फोटो सौजन्य-ChatGPT)
गौरव तोमर नावाच्या एका युजर्सने इंस्टाग्रामवर लिहिले, “इंधनाचे संकट असेल तर मोदीजी लॉकडाऊन लावू शकतात का?” त्याने पंतप्रधान मोदी सभागृहात बोलत असल्याचा एक फोटोही शेअर केला. दुसऱ्या एका युजर्सने लिहिले, “भारतात आणखी एकदा लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे…” सोशल मीडियावर अशा अनेक पोस्ट आहेत, ज्यामुळे लॉकडाऊनबद्दलच्या चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे.
पंतप्रधान मोदींनी सोमवारी लोकसभेत युद्धावर भाषण दिले. यावेळी भाषणात सांगितले की, या संकटाचा परिणाम दीर्घकाळ टिकणारा असेल आणि कोविड-१९ च्या संकटाप्रमाणेच नागरिकांना त्याचा सामना करावा लागेल. तसेच “या युद्धामुळे जगात निर्माण झालेल्या परिस्थितीचा परिणाम दीर्घकाळ टिकण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण तयार राहिले पाहिजे, आपण एकजूट राहिले पाहिजे. कोविड-१९ महामारीच्या काळात आपण अशा आव्हानांना एकजुटीने तोंड दिले आहे. आता, आपल्याला पुन्हा तयार राहण्याची गरज आहे. आपण प्रत्येक आव्हानाला संयम, सहनशीलता आणि शांत मनाने सामोरे गेले पाहिजे.”
पंतप्रधानांनी सांगितले की, पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थिती, जी तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळापासून सुरू आहे, तिने भारतासमोर आर्थिक सुरक्षा, राष्ट्रीय सुरक्षा आणि मानवी सुरक्षेशी संबंधित अभूतपूर्व आव्हाने उभी केली आहेत. “या संकटासंदर्भातील संदेश भारतीय संसदेतून एकमताने आणि एकजुटीने जगापर्यंत पोहोचणे अत्यावश्यक आहे.”
विशेष म्हणजे, त्यांनी आपल्या भाषणात कुठेही ‘लॉकडाऊन’ हा शब्द वापरला नाही. शिवाय, सरकारने देशात कोणतेही सार्वजनिक निर्बंध जाहीर केलेले नाहीत. या संदर्भात सोशल मीडियावरच्या पोस्ट केवळ अफवा आहेत.
२४ मार्च २०२० रोजी, पंतप्रधान मोदींनी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशव्यापी लॉकडाउनची घोषणा केली. देशात कोरोना विषाणूने संक्रमित झालेल्या लोकांची संख्या ५०० च्या पुढे गेल्यानंतर हा खबरदारीचा उपाय म्हणून घेण्यात आला. कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी भारताने लॉकडाउनचे उपाय लागू केल्यामुळे, जगभरातील २.६ अब्जाहून अधिक लोक निर्बंधांखाली आले.