सन 1947.. भारताला वसाहतवादी राज्यकर्त्यांपासून म्हणजेच ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळालं. हे स्वातंत्र्य ज्याला मिळवण्यासाठी कित्येक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांचा बलिदान दिलं, कित्येक आंदोलनं करण्यात आली, चळवळी करण्यात आल्या, लढा देण्यात आला. आपल्या देशावर प्रेम करणाऱ्या कित्येकांनी आपली संपूर्ण आयुष्य या देशासाठी आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी झोकून दिली. तेव्हा जाऊन या अडीचशे वर्षांचा वनवास संपला आणि भारत स्वतंत्र झाला आणि सार्वभौम भारतीय गणराज्य बनला.
पण हे स्वातंत्र्य ही बऱ्याच मोठ्या अडचणी घेऊन आलं, त्यातली सर्वात मोठी अडचण म्हणजे भारत पाकिस्तानची फाळणी. ब्रिटिश राज संपुष्टात आलं खरं पण त्यांची कुटनीती म्हणजे फोडा आणि राज्य करा, ही सगळ्या भारतीय उपखंडावर विपरीत परिणाम करून गेली. 1947 ला स्वतंत्र भारत आणि स्वतंत्र पाकिस्तान यांची निर्मिती झाली. मुस्लिम लीगच्या संगनमतातून मुस्लिम जनतेसाठी स्वतंत्र राष्ट्र म्हणजेच पाकिस्तानची मागणी करण्यात आली. आणि ती सुदैवानं की दुर्दैवानं पूर्ण ही झाली. या स्वतंत्र पाकिस्तानच्या मागणीचा मुख्य चेहरा होता तो म्हणजे ‘मोहम्मद अली जिना’ ज्यांना पाकिस्तानचे संस्थापक ‘कायदेआजम मोहम्मद अली जिना’ असेही म्हटलं जातं. ब्रिटिश भारतापासून वेगळा स्वतंत्र पाकिस्तान राष्ट्र निर्माण करणारे मोहम्मद अली जिना होते तरी कोण? त्यांचे पूर्वज कोण होते? त्यांचे कुटुंब, परिवार नेमका कुठून होता? आज इथे जाणून घेऊयात,
मोहम्मद अली जिनांचे आजोबा गुजरात मधील राजकोट इथल्या ‘पानेली मोटी’ या गावात राहायचे. त्यांचं नाव होतं पुंजाभाई ठक्कर. पुंजाभाई ठक्कर म्हणजेच अली जिनांचे आजोबा लोहाना ठक्कर या हिंदू रघुवंशी जातीचे होते. आजही त्यांच जुनं राहतं घर पानेली गावात मोहम्मद अली जिनांच घर म्हणून प्रसिद्ध आहे. पुंजाबाई यांचा परिवार व्यवसाय क्षेत्रातील होता, म्हणून त्यांनी त्याकाळी मच्छीमारीचा-मासे विकण्याचा व्यवसाय सुरू केला. पुंजाभाईंच्या या मासे विकण्याच्या व्यवसायाला त्यांच्या जातीतील लोकांकडून भरपूर विरोध झाला. पानेली गावातील लोहाना ठक्कर समाज त्यावेळी थोड्या मागासलेल्या विचारांचा असल्यामुळे पुंजाभाईंना त्यांच्या समाजातून जात बाहेर करण्यात आलं. त्यांना जात बाहेर केलं गेल्यामुळे पुंजाभाईनी धर्म परिवर्तन करून इस्लाम स्वीकारला. ‘शिया खोजा’ मुस्लिम समुदायात त्यांनी स्वतःला स्वीकारलं. असं म्हटलं जातं की त्यांना या गोष्टीचा पुन्हा पश्चातापही झाला होता, त्यांना पुन्हा हिंदू बनायचं होतं पण तसं होऊ शकलं नाही. पुंजाभाईना एकूण चार मुलं होती. तीन मुले वलजीभाई, नथूभाई आणि जेनाभाई आणि एक मुलगी जिच नाव होतं मानबाई. पुंजाभाई आपल्या चारही मुलांबरोबर पानेली मोटी गावातच शेवटपर्यंत राहिले.
जगभरातील ते देश जिथे एकही मुस्लिम नाही; वाचा संपूर्ण लिस्ट
पण त्यांचा सगळ्यात लहान मुलगा म्हणजे जेनाभाई व्यवसायानिमित्त शेजारच्या गोन्दल इथे गेले. आणि त्यानंतर आपली पत्नी मिठीबाई बरोबर आजच्या पाकिस्तानमधील कराचीला स्थायिक झाले. 1876 मध्ये मिठी बाईंनी एका मुलाला जन्म दिला, जो पुढे जाऊन ‘स्वतंत्र पाकिस्तानचा मुख्य चेहरा’ म्हणजेच ‘कायदेआझम मोहम्मद अली जिना’ बनला. याप्रमाणे मोहम्मद अली जिना यांचे पूर्वज गुजरातच्या राजकोटमधील मधील एका गावातून असून हिंदू रघुवंशी जातीचे असल्याचे स्पष्ट होते.






