ओडिशात राज्यसभा निवडणुकीत राजकीय भूकंप; बीजेडी आणि काँग्रेसच्या ११ आमदारांचे 'क्रॉस-व्होटिंग'
ओडिशात राज्यसभा निवडणुकीदरम्यान बीजेडी आणि काँग्रेसच्या तब्बल ११ आमदारांनी पक्षादेश डावलून क्रॉस-व्होटिंग केले. बीजेडीचे आमदार देवी रंजन त्रिपाठी यांनी आपण भाजप समर्थित उमेदवार दिलीप रे यांना मतदान केल्याची जाहीर कबुली दिली आहे. बीजेडी आणि काँग्रेसमधील ‘अनैतिक युती’ आपल्याला मान्य नसल्याने आणि बिजू पटनायक यांचा वारसा जपण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्रिपाठी यांनी स्पष्ट केले.
तर, काँग्रेसचे दशरथी गोमांगो, सोफिया फिरदौस, रमेश चंद्र जेना तसेच बीजेडीचे चक्रमणी कन्हार, सुभाषिनी जेना, सौविक बिस्वाल आणि अन्य निलंबित आमदारांनी भाजप पुरस्कृत उमेदवार दिलीप रे यांच्या बाजूने मतदान केल्याची समोर आले. या मोठ्या बंडाळीमुळे ओडिशामध्ये राजकीय गोंधळ निर्माण झाला असून दोन्ही पक्षांतील अंतर्गत असंतोष चव्हाट्यावर आला आहे.
ओडिशात सुरू असलेल्या राज्यसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेवर बिजू जनता दलाचे प्रमुख नवीन पटनायक यांनी तीव्र असंतोष व्यक्त केला. ब्रह्मगिरी विधानसभा मतदारसंघातील एका आमदाराने मतदानावेळी चूक केल्यानंतर, निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांना बेकायदेशीरपणे दुसरी मतपत्रिका उपलब्ध करून दिली,असा दावा पटनायक यांनी केला आहे. हा प्रकार लोकशाही मूल्यांच्या विरोधात असून निवडणूक नियमांचे उघड उल्लंघन असल्याचे सांगत त्यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर जोरदार टीका केली आहे.
तर बीजेडी आमदार देवी त्रिपाठी यांनी “अयोग्य युती”च्या उमेदवाराला मतदान करण्यास नकार देत आपल्या विवेकाने वेगळी भूमिका घेण्यास भाग पाडल्याचे सांगितले. तसेच, सौविक बिस्वाल यांनीही “बिजू बाबूंचा आशीर्वाद” असलेल्या उमेदवाराला मतदान केल्याची कबुली देत पक्षाच्या अंतर्गत कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
Operation Lotus News:ओडिशात ऑपरेशन लोटस? काँग्रेसच्या आमदारांना प्रत्येकी ५ कोटींची ऑफर
दुसरीकडे, काँग्रेसमध्येही मोठी फूट दिसून आली आहे. प्रदेशाध्यक्ष भक्त चरण दास यांनी आपली मुलगी सोफिया फिरदौस आणि रमेश जेना यांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. सोफिया सुशिक्षित असूनही तिने पक्षादेशाबाहेर जाऊन मतदान केल्याचा संशय दास यांनी व्यक्त केला. “सोफियाचे भविष्य उज्ज्वल आहे असे वाटले होते, परंतु तिने दिलेले मत धक्कादायक आहे,” अशा शब्दांत दास यांनी आपली हतबलता व्यक्त केली.
ओडिशात राज्यसभेच्या चार जागांसाठी पाच उमेदवारांमध्ये चुरशीची लढत होत असून, क्रॉस-व्होटिंगच्या आरोपांमुळे ही निवडणूक अत्यंत तणावपूर्ण बनली आहे. भाजपने मनमोहन सामल आणि सुजित कुमार यांना उमेदवारी दिली असून, अपक्ष उमेदवार दिलीप राय यांनाही पाठिंबा जाहीर केला आहे. बीजेडीकडून संतृत मिश्रा रिंगणात आहेत, तर डॉ. दत्तेश्वर होता हे बीजेडी, काँग्रेस आणि सीपीआय(एम) चे संयुक्त उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत.
निवडणूक नियमानुसार, आमदारांना आपली मतपत्रिका पक्षाच्या अधिकृत एजंटला दाखवणे बंधनकारक आहे. भाजपसाठी उपमुख्यमंत्री कनक वर्धन सिंहदेव आणि कायदा मंत्री पृथ्वीराज हरिचंदन, बीजेडीसाठी प्रताप केशरी देव तर काँग्रेससाठी भक्त चरण दास एजंट म्हणून काम पाहत आहेत. प्रत्यक्ष मतदानावेळी झालेल्या राजकीय बंडाळीमुळे आता सर्वांचे लक्ष या निवडणुकीच्या निकालाकडे आणि त्यानंतर होणाऱ्या राजकीय उलथापालथीकडे लागले आहे.






