
दिल्लीतील प्रदूषणामुळे मोठं संकट; लहान मुलांसह गर्भवती महिला, ज्येष्ठांना धोका, केंद्राने जारी केल्या सूचना...
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत प्रदूषणाची समस्या गंभीर बनताना दिसत आहे. या प्रदूषणामुळे लहान मुलांसह गर्भवती महिला, ज्येष्ठांना धोका असल्याचे दिसून आले आहे. केंद्र सरकारने आरोग्य मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. केंद्र सरकारने मुले, गर्भवती महिला आणि वृद्धांना वायू प्रदूषणामुळे मोठा धोका असल्याचे सांगितले.
प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर राज्यांना त्वरित उपाययोजना करण्याचे निर्देश देत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने उत्तर भारतातील सर्व राज्यांना 33 पानांची मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. प्रदूषणाशी संबंधित श्वसन आणि हृदयरोगांचे आजार वाढत असल्याचे सांगून आरोग्य यंत्रणेला सतर्क केले. मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात, केंद्रीय सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी म्हटले की, ”हवेची गुणवत्ता सतत खालावत आहे, ज्यामुळे सार्वजनिक आरोग्यासाठी एक गंभीर आव्हान निर्माण झाले आहे. निरोगी आणि स्वच्छ वातावरण निर्माण करण्यासाठी आपण एकत्र काम केले पाहिजे”.
हेदेखील वाचा : दिल्लीमधील वाढते वायू प्रदूषण आरोग्यासाठी बनतंय खूप धोकादायक; कायमस्वरुपी उपाययोजनांची गरज
दरम्यान, केंद्र सरकारने राज्यांना पाचवीपर्यंतच्या मुलांसाठी ऑनलाईन अभ्यासाची परवानगी दिली आहे. तसेच बांधकाम स्थळांकडेही लक्ष द्यावे. केंद्राने म्हटले आहे की, या ठिकाणी धूळ नियंत्रणासाठी पाणी शिंपडणे, साहित्य झाकणे आणि कामगारांना उपकरणे आणि मास्कची सोय करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. बांधकाम कामगारांसाठी नियमित आरोग्य तपासणी आणि प्रशिक्षण देखील अनिवार्य आहे.
राज्यांना मदत कार्य वाढवण्याच्या सूचना
केंद्रीय सचिवांनी राज्यांना त्यांचे राज्य आणि जिल्हा कार्य दल त्वरित सक्रिय करण्यास आणि पर्यावरण, वाहतूक, शहरी विकास, महिला आणि बाल विकास आणि कामगार विभागांशी समन्वय वाढवण्यास सांगितले आहे. त्यांनी दिल्ली-एनसीआरमध्ये आधीच लागू केलेल्या श्रेणीबद्ध प्रतिसाद कृती योजना (GRAP) ची देखील काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे म्हटले आहे.
राजधानी दिल्लीत प्रदूषणाची स्थिती बनतीये धोकादायक
राजधानी दिल्लीत प्रदूषणाची स्थिती गंभीर बनताना दिसत आहे. दिल्लीत हवा विषारी होत आहे. त्यामुळे प्रदूषणात वाढ होत आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (CPCB) आकडेवारीनुसार, दिल्लीतील अनेक भागातील हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) ‘अत्यंत वाईट’ श्रेणीत पोहोचला. बवानामध्ये परिस्थिती विशेषतः गंभीर असून, येथील AQI हा 403 वर पोहोचला होता. त्यानंतरही आता हवेची गुणवत्ता खालावल्याचे दिसून येते.