शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रताप्रकरणी एकत्रित सुनावणी; वाचा सर्वोच्च न्यायालयात नेमकं काय घडले?

    Shivsena and NCP MLA Disqualification Case : शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रताप्रकरणी आजची सुनावणी पूर्ण झाली आहे. आज सर्वोच्च न्यायालयात काय घडलं? सर्वोच्च न्यायालयाकडून विधानसभा अध्यक्षांना कोणत्या सूचना केल्या गेल्या? वेळापत्रकाबाबत न्यायालयाने काय म्हटले? वाचा सविस्तर
    आमदार अपात्रताप्रकरणी आजची सुनावणी पूर्ण
    शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रताप्रकरणी आजची सुनावणी पूर्ण झाली आहे. येत्या 30 ऑक्टोबरला पुढची सुनावणी होणार आहे. 30 ऑक्टोबरला सुधारित वेळापत्रक न्यायालयासमोर मांडण्याची शेवटची संधी असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. आमदार अपात्रेबाबत विधानसभा अध्यक्षांनी तातडीने निर्णय घेण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर आज सुनावणी पार पडली. या सुनावणीवेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड तर ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई आणि अनिल परब हे नेते उपस्थित होते.
    विधानसभा अध्यक्षांसोबत सुनावणीचं वेळापत्रक
    तुषार मेहता यांनी दसऱ्याच्या सुटीच्या दिवशी बसून विधानसभा अध्यक्षांसोबत सुनावणीचं वेळापत्रक ठरवावे. येत्या 30 ऑक्टोबरला सुधारित वेळापत्रक सादर करावे, अशा सूचना सर्वोच्च न्यायालयाने या सुनावणीवेळी दिल्या आहेत. आजच्या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना खडेबोल सुनावले आहेत. तुम्ही दिलेल्या वेळापत्रकावर आम्ही समाधानी नाही. त्यामुळे आता आम्ही शेवटची संधी देत आहोत. 30 ऑक्टोबरला सुधारित वेळापत्रक न्यायालयासमोर मांडा, असे न्यायालयाने म्हटले आहे.
    न्यायालयाकडून राहुल नार्वेकर यांना खडेबोल
    सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कार्यवाहीवर ताशेरे ओढलेत. न्यायालयाने काही निरिक्षणं नोंदवली आहेत. 11 मे नंतर विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना आमदार अपात्रताप्रकरणी काहीही केलेले नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. विधानसभा अध्यक्षांसोबत बसू शकलो नाही. म्हणून आम्हाला थोडा वेळ द्या, असा युक्तिवाद तुषार मेहता यांनी केला. तो युक्तिवाद न्यायालयाने मान्य केला आहे.
    विधानसभा अध्यक्षांना मोठी सुनावणी
    तुषार मेहता यांचा युक्तिवाद लक्षात घेऊनच सर्वोच्च न्यायालयाकडून विधानसभा अध्यक्षांना वेळापत्रक सादर करण्यासाठी शेवटची संधी देण्यात आली आहे. मात्र, आता वेळापत्रक बदलावेच लागेल, असे सर्वोच्च न्यायालयाने खडसावून सांगितले आहे. निवडणूक आयोगाप्रमाणे विधानसभा अध्यक्षांना मोठी सुनावणी घ्यावी लागत नाही, असं निरिक्षणही सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलं आहे. अध्यक्षांनी नीट वेळापत्रक दिले नाही. तर आम्ही वेळापत्रक ठरवू, असं सर्वोच्च न्यायालयाकडून म्हणण्यात आले आहे. विधानसभा अध्यक्षांना माध्यमांशी न बोलण्याबाबतही सूचनाही देण्यात आल्या आहेत.