उत्तर भारतात मुसळधार पावसाचा इशारा
नवी दिल्ली : सध्या देशातील अनेक भागांत मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. केरळ, किनारपट्टी आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटकच्या काही भागांमध्ये पुढील तीन दिवसांत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. याव्यतिरिक्त, या आठवड्यात बहुतेक दिवस वायव्य आणि लगतच्या मध्य भारताच्या अनेक भागांमध्ये, तसेच पूर्व आणि ईशान्य भारताच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.
जम्मू आणि काश्मीर तसेच लडाखच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडेल. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये १२ ऑगस्टपर्यंत मुसळधार पाऊस पडेल. ७ ऑगस्ट रोजी हरयाणा, चंदीगड, दिल्ली आणि पश्चिम उत्तर प्रदेशात, ८ व ९ ऑगस्ट रोजी पूर्व उत्तर प्रदेशात, ९ ऑगस्ट रोजी पश्चिम राजस्थानमध्ये आणि ७ ते १० ऑगस्ट रोजी पूर्व राजस्थानमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.
तसेच, वायव्य भारतातील काही तुरळक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडेल. ७ ते १२ ऑगस्ट दरम्यान उत्तराखंडमध्ये मेघगर्जना आणि विजांचा कडकडाटाचा अंदाज आहे. तर १० ऑगस्ट रोजी पश्चिम राजस्थान आणि पूर्व राजस्थानमध्ये मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा देण्यात आला आहे.
बिहार, बंगालमध्येही मुसळधार पाऊस
देशभरातील अनेक राज्यांत मुसळधार पावसामुळे हाहा:कार माजला आहे. वीज कोसळणे आणि भूस्खलन यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. बिहार आणि बंगालमध्ये वीज कोसळण्याच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये 11 जणांचा मृत्यू झाला असून, 14 जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये बिहारच्या विविध जिल्ह्यांतील 7 आणि बंगालच्या हावडा येथील 4 जणांचा समावेश आहे. पावसाचा परिणाम डोंगराळ राज्यांवरही होत आहे.
पुढील दोन आठवड्यांत मुसळधारेची शक्यता
पुढील 15 दिवसांत देशात नैऋत्य मान्सून अधिक सक्रिय होण्याची शक्यता आहे. हिंद महासागर आणि बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली परिस्थिती देशभरात सर्वत्र पावसासाठी अनुकूल आहे. हिंद महासागर द्विध्रुव (इंडियन ओशन डायपोल) सध्या तटस्थ अवस्थेत आहे. परंतु पूर्व हिंद महासागरावर तीव्र वादळी पावसाची क्रिया सुरू आहे.
सेलूमध्ये रस्ता रुंदीकरणाचा बोजवारा; उघड्या नालीत पडल्या 2 म्हशी, कंत्राटदाराच्या हलगर्जीमुळे अपघात






