मुंबई: भारतातील अल्प उत्पन्न गटातील नागरिकांमध्ये वाढलेल्या आयुर्मानासोबत वाढते आजारांचे ओझे वाढत असून सर्व प्रकारच्या नव्या-जुन्या, संसर्गजन्य व जीवनशैलीने होणाऱ्या आजारांची व्याप्ती वाढताना दिसत आहे. यामध्ये अॅनिमियापासून कॅन्सर तर डायरियापासून एड्स व आता कोरोनासारख्या महामारीचासुद्धा समावेश आहे. कोरोना संक्रमणाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षभरापासून टीबी(TB) या रोगाकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढतो त्यावेळी तो विषाणू फुफ्फुसावर हल्ला करतो. क्षयरोग हा देखील फुफ्फुसाचाच आजार आहे. त्यामुळे कोरोना झाल्यानंतर क्षयरोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही परंतु आजमितीला याचे प्रमाण अथवा टक्केवारी उपलब्ध नाही. मात्र दाटीवाटीच्या वस्तीत कोरोना झालेल्या रुग्णांना क्षयरोग म्हणजेच टीबी होण्याची शक्यता वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त होत आहे.
गेल्या (24 march- World TB Day)जागतिक क्षयरोग दिनाला(world TB Day) ‘न भुतो न भविष्यती’ असा कोरोना महामारीचा काळ सुरु झाल्यापासून सर्व आरोग्य यंत्रणा ही या महामारीशी लढण्यासाठी आपण खर्ची घालत आहोत. कोरोना महामारीच्या पूर्वी भारताला टीबीमुक्त करण्यासाठी अनेक योजना राबविल्या होत्या. महानायक अमिताभ बच्चन यांनी जाहिरातींचे शिवधनुष्य हातात घेतले होते परंतु कोरोनाने या सर्व मेहनतीवर पाणी फिरवले आहे.
[read_also content=”फास्ट फूड आरोग्यासाठी हानिकारक – स्थूलता, ह्रदयविकार आणि किडनीच्या आजारांमध्ये होतेय वाढ https://www.navarashtra.com/latest-news/fast-food-is-dangerous-for-health-may-increase-the-percentage-of-fatness-heart-and-kidney-dieseases-nrsr-106883.html”]
याविषयी डॉ. प्रवीण भुजबळ म्हणाले, “पूर्ण जगातील टीबीचे साधारण एकचतुर्थांश रुग्ण भारतामध्ये आढळतात. टीबी हा संसर्गजन्य आजार आहे. खोकताना, थुंकताना, बोलताना, शिंकताना रुग्णांच्या तोंडातून बाहेर पडणाऱ्या जंतूंमुळे हवेतून पसरणारा हा आजार आहे. उपचार न घेतलेला असा रुग्ण वर्षभरात जवळच्या सान्निध्यातील १० ते १५ व्यक्तींना टीबीची लागण करतो. त्यामुळे टीबीने खोकणाऱ्या व्यक्तीचा आजार हा त्याच्यापुरता मर्यादित प्रश्न नसतो, तर ती सर्व समाजाची समस्या ठरते.
कोरोनाच्या बाबतीत सुद्धा हेच घडत आहे. आज कोरोना झाल्यानंतर रुग्णाला मास्क वापरणे, अंतर राखणे हे सर्व नियम सांगितले जातात. वास्तविक क्षय रुग्णांसाठी आधीपासूनच हे नियम आहेत. कारण खोकताना, थुंकीवाटे जसा क्षयाचा प्रसार होतो तसाच कोरोनाचाही होतो. त्यामुळे रुग्ण तसेच संपर्कातील लोकांनी काळजी घेण्याची गरज असते.
घनदाट लोकवस्ती, दारिद्रय़, कुपोषण, कोंदट घरे, सार्वजनिक वाहतुकीत तुडुंब वाहणारी गर्दी, कोठेही थुंकणे, कसेही खोकणे अशा सवयी, व्यसने अशा पोषक वातावरणात टीबीचा फैलाव हवेतून एकाकडून दुसऱ्याकडे सहजतेने होत जातो आणि मग ज्या व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती कमी, तो अॅक्टिव्ह टीबीचा शिकार होतो. लक्षणे दिसू लागतात. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सध्या क्षय झालेल्या सर्वच रुग्णांची कोरोना चाचणीही करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे कोरोना झालेल्या काही रुग्णांना क्षयाची चाचणी करायला सांगितले जात आहे. काही कोरोना रुग्णांना कोव्हिड बरा झाल्यानंतर खोकला सुरूच राहतो. त्यामुळे मग असे संशयित रुग्ण शोधून त्यांना क्षयाची चाचणी करण्याचा आम्ही सल्ला देत आहोत.
क्षयरोग दिनाचे औचित्य साधून भारत सरकारतर्फे २०२५ पर्यंत ‘क्षयरोगमुक्त भारत’ अभियान राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत विविध उपक्रमाच्या माध्यमातून जनतेमध्ये क्षयरोगाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी जागतिक क्षयरोग दिनाला सुरु झालेले कोरोना संक्रमण अजूनही आटोक्यात आलेले नाही त्यामुळे क्षयरोगाला आवर घालण्यासाठी तोंडावर मास्क, सामाजिक अंतर व स्वच्छतेचे नियम काटेकोरपणाने पाळले पाहिजे असा सल्ला डॉ. प्रवीण भुजबळ यांनी दिला.






