पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्मारकच्या जागेचा प्रस्ताव सादर करा, मंत्री विखेंकडून प्रशासनाला सूचना
गिरीश रासकर, अहमदनगर : श्रीक्षेत्र नेवासे येथे उभारण्यात येणाऱ्या संत ज्ञानेश्वर सृष्टीचा प्रकल्प आणि पुण्यश्लोक अहील्यादेवीचे स्मारक जिल्ह्यात येणार्या पर्यटकासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. ज्ञानेश्वर सृष्टीच्या प्रकल्पाचा आराखडा तातडीने तयार करावा, याचे सादरीकरण लवकरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यासमोर करण्यात येणार असून, पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्मारकाच्या जागेबाबत प्रस्ताव त्वरित सादर करण्याच्या सूचना राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या
जिल्हाधिकारी कार्यालयात संत ज्ञानेश्वर सृष्टी विकास आराखडा आणि अहिल्यादेवी स्मारका बाबत आयोजित आढावा बैठकीत मंत्री विखे पाटील यांनी ज्ञानेश्वर सृष्टीच्या तयार करण्यात आलेल्या आरखड्याची माहीती जाणून घेतली. बैठकीस जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी मंत्री विखे पाटील म्हणाले, संत ज्ञानेश्वर सृष्टीचे काम पर्यावरण बदलात टिकणारे आणि भूकंपरोधक असावे. या सृष्टीच्या भव्यते सोबत भेट देणाऱ्या अध्यात्मिक वातावरणाचा अनुभव येईल अशी रचना असावी. मुख्यमंत्री महोदयांकडे या विकास आराखड्याचे सादरीकरण लवकरच करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. नेवासाचे स्थान महात्म्य देशभरात पोहोचविणारे स्मारक असावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त करतानाच निर्माण होणारे स्मारक राज्यातील वारकरी सांप्रदयाच्या दृष्टीने तसेच जिल्ह्यात येणारे भाविक पर्यटक यांच्यासाठी महत्वपूर्ण ठरेल असे असावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक देशातील उत्तम स्मरकांपैकी एक असेल असा आराखडा तयार करावा. स्मारकाच्या ठिकाणी महिला सक्षमीकरण केंद्र असावे. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने विविध प्रशिक्षण, अभ्यासक्रम आदींची सुविधा येथे असावी, अशा सूचना पालकमंत्री विखे पाटील यांनी केल्या. यावेळी संत ज्ञानेश्वर सृष्टी आणि अहिल्यादेवी स्मारकाबाबत सादरीकारणाद्वारे माहिती देण्यात आली.
दरम्यान पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अहमदनगर-शिर्डी रस्त्याच्या कामाचाही आढावा घेतला. रस्त्याची कामे करतांना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ट्रॅफिक वॉर्डन नेमावे. अजूनही खड्डे दुरुस्तीचे काम झालेले नाही ते त्वरित करण्यात यावे असे निर्देश त्यांनी यावेळी प्रशासनाला दिले.