
७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमास या पॅलेस्टिनी दहशतवादी संघटनेने इस्रायलमध्ये घुसून मोठा दहशतवादी हल्ला केला. यात मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी झाली. याशिवाय इस्रायलच्या दोनशेहून अधिक नागरिकांना पळवून नेण्यात आलं. सहाजिकच लगोलग इस्रायलने हमासच्या कार्यक्षेत्रावर म्हणजे गाझापट्टीवर जबरदस्त हल्ला केला तो हमासची संपूर्ण यंत्रणा मोडून काढण्याच्या इराद्याने. अमेरिका आणि युरोपियन देश इस्रायलच्या बाजूने उभे राहिले तर कुवेत, इराण यासारखे काही देश सोडता हमासच्या बाजूने उघड उघड पाठिंबा देण्याचे त्याच्या नेहमीच्या पाठीराख्यांनी टाळले. सौदी अरेबिया, जॉर्डन, युएई इजिप्त यासारख्या देशांनी आजवर इस्रायल विरुद्ध नेहमीच पॅलेस्टाईन लोकांना साथ दिली आहे; परंतु गेल्या काही वर्षात बदललेली भूराजकीय परिस्थिती आणि आर्थिक हितसंबंध यामुळे हे देश पूर्वीच्या आक्रमकतेने इस्रायल विरोधात उभे असलेले दिसत नाहीत. याउलट इराणने मात्र हमासला आधी छुपा आणि आता उघडपणे पाठिंबा द्यायला सुरुवात केली आहे. इस्रायल हमास यांच्यात नव्याने सुरू झालेला संघर्ष हा खरंतर पूर्वनियोजित आणि विशिष्ट हेतू साध्य करण्यासाठी मुद्दामहून उकरून काढलेला असल्याचं चित्र हळूहळू स्पष्ट होऊ लागले आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात गेल्या चाळीस वर्षांपेक्षा जास्त काळापासून सुरु असलेल्या शीतयुध्दामुळे पश्चिम आशियाई प्रदेश सातत्याने युद्धाच्या छायेत राहिला आहे.
१९७९ मध्ये इराणमध्ये सत्ता बदल झाला आणि देशाची सत्ता शहा रझा पेहेलवी यांच्याकडून खोमेनी या इस्लामिक धर्मगुरूच्या हाती गेली. इस्लामिक कट्टरतावाद आणि अमेरिका विरोध ही खोमेनींच्या कारकिर्दीची ठळक वैशिष्ट्ये. इराण हा प्रामुख्याने मुसलमानांमधील शियापंथीय लोकांचा देश. आजूबाजूच्या इराक, सीरिया, येमेन, पाकिस्तान, भारत इथे शियापंथीय लोकांचे वास्तव्य पण एकुणातच शियापंथीय मुस्लिमांची संख्या सुन्नीपंथीय मुस्लिमांच्या तुलनेत फारच कमी. फार पूर्वीपासून शिया आणि सुन्नी पंथांमध्ये तीव्र संघर्ष होत आला आहे. त्यामुळे शिया इराण विरुद्ध अमेरिकेने आधी सद्दाम हुसेनच्या सुन्नी इराकला हाताशी धरलेलं होतं. सद्दाम हुसेन अमेरिकेला नकोसा झाल्यावर इराण विरोधाची प्रमुख धुरा सौदी अरेबियाकडे आली. सतत युद्धाच्या छायेत राहणाऱ्या इराणने आपल्या विरोधी गटांना हैराण करण्यासाठी ठिकठिकाणच्या शिया मुस्लिमांना पैसा आणि शस्त्रांच्या रूपाने भरपूर मदत करायला सुरुवात केली. याचा परिणाम म्हणून लेबेनॉन येथे हिजबुल्ला, येमेन येथे हौथी हे दहशतवादी गट उभे राहिले आणि प्रबळ झाले. पॅलेस्टिनी लोकांची हमास ही संघटना इराणच्या मदतीने शक्तिशाली बनली. गंमत म्हणजे हमासमध्ये मोठ्या प्रमाणात सुन्नी मुस्लिम आहेत; पण इस्रायल हा दोघांचा सामायिक शत्रू या नात्याने या दोघांमध्ये सहकार्याचे वातावरण तयार झाले.
२००३ मध्ये अमेरिकन फौजा इराकमध्ये घुसल्या आणि पुढे सद्दाम हुसेन यांना फाशी देण्यात आली. आजवर सद्दाम हुसेनच्या सुन्नी सरकारच्या दडपशाहीखाली राहणाऱ्या शियांनी मग तिथे उचल खाल्ली. आज इराकच्या राज्यसत्तेमध्ये शियापंथीय लोकांचा मोठा प्रभाव आहे. इराणने इथल्या शिया गटांच्या मदतीने या भागात आपला चांगलाच जम बसविला आहे. इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (आयआरजीसी) नावाची सशस्त्र दहशतवादी संघटना थेट राष्ट्रप्रमुख खोमेनींच्या अधिपत्याखाली असते. ‘आयआरजीसी’मार्फत शिया गटांना लष्करी प्रशिक्षण, पैसा आणि शस्त्रे पुरविली जातात.
आज इस्रायल-हमास युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणच्या या विविध संघटना इस्रायलविरुद्ध आणि परिणामी अमेरिकेविरुद्ध उभ्या ठाकल्या आहेत.
लेबेनॉनमधील हिजबुल्ला सातत्याने उत्तर इस्रायलवर हल्ला करण्याच्या प्रयत्नात असते, तशा धमक्या देत असते. येमेनमधील हौथी बंडखोरांनी तांबड्या समुद्रामार्गे जाणाऱ्या जहाजांवर हल्ले करायला सुरुवात केली आहे. युरोप, उत्तर आफ्रिका आणि काही पश्चिम आशियातील देशांचा आशिया खंडातील भारत, चीन व इतर देशांशी होणारा व्यापार याच मार्गे चालतो. सहाजिकच जागतिक व्यापारावर या अडवणुकीचा विपरीत परिणाम होऊ लागला आहे. अमेरिकेने यासाठी स्वतःच्या अजस्त्र विमानवाहू युद्धनौका तांबड्या समुद्रात पाठविल्या आहेत. इतकच नव्हे तर दहा अन्य देशांबरोबर सागरी मार्गाच्या रक्षणासाठी एकत्र मोहीम राबवायला सुरुवात केली आहे. अर्थात हौथी बंडखोरांकडे इराणकडून मिळालेली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन यासारखी शस्त्रे असल्याने जहाजांवरील हल्ले पूर्णपणे रोखण्यात अमेरिकेला यश आलेले नाही त्यामुळे अमेरिका व ब्रिटिश फौजानी हौथी बंडखोरांच्या येमेन मधील तळांवर हवाई हल्ले करायला सुरुवात केली आहे. बंडखोरांच्या प्रमुखाने या हल्ल्यांचा बदला घेण्याची घोषणा केल्याने या पूर्ण भागातील तणाव दिवसेंदिवस वाढतोच आहे. दुसरीकडे इराक, सीरिया या भागातील अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ले होऊ लागले आहेत तर अमेरिका या भागातील शिया संघटनांच्या ठिकाणांवर हल्ले करीत आहे. खुद्द इराकी सरकार आता अमेरिकेने त्यांच्या देशातील लष्करी तळ बंद करून निघून जावे अशी मागणी करू लागले आहे. अमेरिका अशी चांगलीच अडचणीत सापडली असताना ३ जानेवारी २०१४ रोजी इराणच्या केरमान प्रांतात एका स्मृतीसमारंभात दोन शक्तिशाली बॉम्बस्फोट झाले. आयआरजीसी या इराणच्या संघटनेचे माजी प्रमुख मेजर जनरल कासिम सुलेमानी चार वर्षांपूर्वी अमेरिकेने केलेल्या हल्ल्यात इराकमध्ये मारले गेले होते. त्यांच्या स्मरणार्थ आयोजित कार्यक्रमात झालेल्या बॉम्बस्फोटांनी अनेकांना प्राण गमवावे लागले शिवाय इराणच्या अंतर्गत सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले.
सुरुवातीला या हल्ल्यांची जबाबदारी ‘इस्लामिक स्टेट’ या संघटनेने उचलल्याचं माध्यमांमधून प्रसिद्ध झालं. इस्लामिक स्टेट ही अमेरिकेच्या आधाराने मोठी झालेली सुन्नी मुस्लिमांची दहशतवादी संघटना. नंतर या संघटनेला संपवण्यासाठी अमेरिकेला फौज उतरवावी लागली. असो, या सुन्नी संघटनेला हाताशी धरून शिया इराणमध्ये घातपात घडविला गेला असावा असा विश्लेषकांच्या अंदाज होता. परंतु दिनांक १६ जानेवारी रोजी इराणने पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात क्षेपणास्त्रांच्या साहाय्याने ‘सर्जिकल स्ट्राइक’ केला. जैश अल अदली या पाकिस्तानस्थित दहशतवादी गटाने इराणमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणल्याचा आरोप करीत या संघटनेच्या मुख्य ठिकाणांवर इराणने हल्ले केले. त्यांनतर दोनच दिवसांनी पाकिस्ताननेही इराणी भागात घुसून इराणला प्रत्युत्तर द्यायचा प्रयत्न केला आहे. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे इराण आणि पाकिस्तान यांचे संबंध चांगलेच ताणले गेले आहेत. आजवर इराणशी लढण्यासाठी इराक, सौदी अरेबिया यांचा वापर करणाऱ्या अमेरिकेने यावेळी पाकिस्तानला हाताशी धरले की काय असं वाटू लागलं आहे. कारण या घटनेच्या काही दिवस अगोदर पाकचे लष्कर प्रमुख आणि आयएसआयचे प्रमुख यांनी अमेरिकेचा दौरा केला होता. काही दिवसांनी अफगाणिस्तानातील तालिबान गट देखील इराण विरुद्ध उतरलेला दिसला तर त्यात आश्चर्य वाटू नये. एकाला हाताशी धरून दुसऱ्या विरुद्ध लढविण्यात अमेरिका वाकबगार आहेच. अमेरिका आणि इराण दोघेही एकमेकांविरुद्ध थेट लढण्याचा धोका न पत्करता पाहुण्याच्या काठीने साप मारावा याप्रमाणे इतर गटांना हाताशी धरून एक प्रकारे प्रॉक्सी वॉर खेळत आहेत.
भारताच्या संदर्भात
अमेरिकेचे इराणशी असलेले तणावाचे संबंध भारतासाठी नेहमीच डोकेदुखी ठरले आले आहेत. पाकिस्तानला वळसा घालून इराणमार्गे अफगाणिस्तान आणि मध्य आशियातील इतर देशांपर्यंत पोहोचण्याचा भारताचा प्रयत्न आहे. इराणमधील ‘चाबहार’ हे बंदर विकसित करून ते दीर्घकाळ चालवण्याचा करार इराणबरोबर नुकताच भारताने केला. खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचे मोठे साठे इराणकडे उपलब्ध असतानाही अमेरिकेने घातलेल्या निर्बंधामुळे भारत इराणकडून तेल व वायू विकत घेऊ शकत नाही. अमेरिकेची पाकिस्तानसोबत वाढू लागलेली सलगी ही आर्थिकदृष्ट्या मरणपंथाला लागलेल्या पाकिस्तानसाठी जीवनदायी ठरू शकते; जे भारताच्या दृष्टीने धोकादायक आहे. तांबडा समुद्र आणि त्याच्या आजूबाजूच्या प्रदेशातून भारताची आयात निर्यात करणारी जहाजे मोठ्या प्रमाणात जातात. या जहाजांच्या रक्षणासाठी भारताने इथे लढाऊ जहाजे तैनात केली असली तरी ही परिस्थिती दीर्घकाळ राहिल्यास व्यापारावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे येथील परिस्थिती लवकरात लवकर निवळावी यासाठी भारत राजनैतिक पातळीवर प्रयत्न करतो आहे आणि असे करण्यासाठी लागणारी विश्वासार्हता आजघडीला फक्त भारताकडेच आहे.
– सचिन करमरकर