पुणे : शेजारी राहणाऱ्या दाम्पत्याने मावशीच्या मुलीचे लग्न आहे. तुमच्या मुलाला आम्ही गावाला घेऊन जातो म्हणून नेत मुलाला घेऊन पोबारा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हे दाम्पत्य ६ वर्षाच्या चिमुरड्याला घेऊन गेले असून, त्यांचा शोध आता पोलिसांकडून घेतला जात आहे. याप्रकाराने मुलाच्या कुटूंबियाचा जिव टांगणीला लागला आहे.
अंजली प्रमोद शुक्ला (वय २१) आणि नितीन प्रमोद शुक्ला (वय १९, दोघेही रा. उत्तरप्रदेश) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २७ एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडला. याबाबत एका ३८ वर्षीय महिलेनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार कुटूंब मुंबईचे आहे. ते येरवड्यातील नातेवाईकांकडे सहा वर्षाच्या मुलाला घेऊन आले होते. नातेवाईकांच्या शेजारी एक उत्तरप्रदेशातील कुटुंब होते. एकमेकांचे शेजारी असल्याने त्यांच्यात सलोख्याचे वातावरण होते. त्याचाच फायदा घेत अंजली आणि प्रमोद यांनी तक्रारदार यांच्या ६ वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलीचे लग्न आहे, चिमुकल्याला घेऊन जाऊ का ? अशी विचारणा केली. त्यावर तक्रारदारांनी त्यांना होकार दिला. मुलाला त्यांच्याबरोबर आठवडा भरापूर्वी स्वखुशीने पाठवले.
उत्तर प्रदेशात पोहचल्याबाबत त्यांचा फोनही आला. मात्र अचानक प्रमोद व अंजलीचा फोन वारंवार स्विचऑफ येत असल्याने कुटुंबियांची धाकधुक वाढली. सरते शेवटी त्यांनी येरवडा पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. येरवडा पोलीस उत्तर प्रदेश पोलिसांच्या संपर्कात आहेत. तेथील स्थानिक पोलिसही मुलाचा शोध घेत असून येरवडा पोलिसांकडून सर्व बाजुंनी मुलाशी व त्या दोघांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला जात आहे.