मुंबई : मुंबईत विविध प्राधिकरणे यांच्यातील समन्वयाचा अभाव पाहता मुंबईच्या सुरक्षिततेसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणे, एकच प्राधिकरण असणे आणि पुढील ५० वर्षांसाठी ठोस व दीर्घकालीन नियोजन करणे आवश्यक आहे, असे ठाम मत राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.
मुंबईतील पूर जोखीम व व्यवस्थापन संदर्भात विचारमंथन करण्यासाठी मुंबई महापालिका व वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट इंडिया या संस्थेच्या सहकार्याने सह्याद्री अतिथीगृह येथील सभागृहात २८ व २९ एप्रिल रोजी दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेचा शुभारंभ राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आला.
यावेळी, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू, प्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या) अशोक मेस्त्री, मुंबई महापालिका आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे संचालक महेश नार्वेकर, वरिष्ठ अधिकारी, पर्यावरण तज्ञ, विविध सामाजिक, शैक्षणिक संस्था यांचे तज्ञ, अभियंते, प्रतिनिधी हे उपस्थित होते.
मुंबईसह जगभरात ग्लोबल वॉर्मिंगमुळे ऋतू बदल, हवामान बदल होऊन त्याचा विपरीत परिणाम होत आहे. मुंबईत कधी नव्हे ती भयंकर स्वरूपाची वादळे धडकत आहेत. कधी उष्णता वाढते तर कधी कडाक्याची थंडी पडते. पावसाळ्यात अतिवृष्टी होऊन सखल भागात पाणी साचून पूरस्थिती निर्माण होत आहे. त्याचा मुंबई शहरावर, जनजीवनावर व एकूणच मुंबईकरांवर विपरीत परिणाम होत आहे. मुंबईत विविध प्राधिकरणे यांच्यातील समन्वयाचा अभाव पाहता मुंबईच्या सुरक्षिततेसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणे, एकच प्राधिकरण असणे आणि पुढील ५० वर्षांसाठी ठोस व दीर्घकालीन नियोजन करणे आवश्यक आहे, असे मत पर्यावरण मंत्री ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.
मुंबईची लोकसंख्या, वाढते शहरीकरण, वाढती रहदारी, प्रदूषण, पावसाळ्यात निर्माण होणारी पूरस्थिती हे पाहता मुंबईच्या सुरक्षिततेबाबत ठोस व दीर्घकालीन उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे, असे मत पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केले. मुंबईत एकीकडे झपाटयाने विकासकामे होत आहेत. मातीची मैदाने कमी होऊन उंच इमारती, सिमेंटचे रस्ते वाढत आहेत. त्यामुळे पाणी जमिनीत मुरत नाही. ते पाणी नद्या, नाले यांना जाऊन मिळते. त्यातच ग्लोबल वॉर्मिंगमुळे काही बदल होत आहेत. वाढत्या शहरीकरणात १९८० पासून ते आजपर्यंत मुंबईतील हरित पट्टे कमी झाले आहेत. मार्च, एप्रिल महिन्यात कडाक्याची उष्णता जाणवते. गेल्या २-३ वर्षात मुंबईत वादळे धडकली. फेब्रुवारी महिन्यात कडाक्याची थंडी पडून स्वेटर घालावे लागले होते. हवामान खात्याकडून पुढील तीन तासाचे अंदाज येतात मात्र पुढील तीन दिवसाचे अंदाज येत नाहीत. त्यामुळे अशा परिस्थितीत मुंबईच्या सुरक्षिततेबाबत विचारमंथन करणे, उपाययोजना करणे आवश्यक झाले आहे.
[read_also content=”व्यवस्था पर्यावरणाप्रती असंवेदनशील : अॅड. असीम सरोदे https://www.navarashtra.com/maharashtra/the-system-is-insensitive-to-the-environment-adv-asim-sarode-nrdm-274126.html”]
मुंबई महापालिका सर्वतोपरी उपाययोजना करीत आहे. मात्र मुंबईत एखादा रस्ता बनवायचा असेल तर जमिनीखालील ४३ युटिलिटी हटविणे व त्यासाठी त्यांची परवानगी घ्यावी लागते. तसेच मुंबईत म्हाडा, एमएमआरडीए, रेल्वे अशी १६ विविध प्राधिकरणे असून त्यांच्यात समन्वयाचा अभाव जाणवतो. त्यामुळे मुंबईच्या सुरक्षिततेसाठी एकच प्राधिकरण असणे आणि किमान ५ वर्षांसाठी नव्हे तर पुढील ५० वर्षांसाठी ठोस व खास नियोजन करणे आवश्यक आहे, असे मत मंत्री ठाकरे यांनी व्यक्त केले. सत्रात प्रारंभी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी पावसाळ्यात पालिकेने केलेल्या उपाययोजनांच्या माहितीचे सादरीकरण केले.