
फोटो सौजन्य - Social Media
खामगाव तालुक्यातील लाखणवाडा बु., जळका भडंग, नायदेवी, हिवरखेड, चिचपूर यांसह अनेक गावांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. तसेच शेगाव तालुक्यातील सवर्णा, माटरगाव बु., घुई, जाणोरी, भोनगाव, खातखेड आणि मलकापूर तालुक्यातील दाताळा, देवधाबा, बलाड, वाघूड, भडाग्ना, धरणगाव, रनथम आदी गावांमध्येही उपाययोजना राबविण्यात येणार आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट निर्देश देताना सांगितले की, नव्या विंधन विहिरी किंवा कुपनलिका सुरू करण्यापूर्वी नादुरुस्त हातपंप दुरुस्त करण्यास प्राधान्य दिले जावे. सर्व कामांचे जिओ-टॅगिंग करून छायाचित्रांसह नोंद ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. मंजूर कामे ३० जून २०२६ पूर्वी पूर्ण न झाल्यास मंजुरी आपोआप रद्द होणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय, विंधन विहिरी पूर्ण झाल्यानंतर संबंधित गावात पुरेसे पाणी उपलब्ध झाल्यास टँकरद्वारे किंवा खाजगी विहिरी अधिग्रहणाद्वारे सुरू असलेला पाणीपुरवठा बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अपूर्ण राहिलेल्या कामांचे देयक पाणीटंचाई निधीतून अदा केले जाणार नसल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे. महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) अधिनियम २००९ अंतर्गत आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले असून, कामांच्या प्रगतीचा साप्ताहिक अहवाल प्रत्येक गुरुवारी सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.