
Ahilyanagar मध्ये तापमान ४० पार; उष्णतेच्या तडाख्याने जनजीवन विस्कळीत, रुग्णालयात ‘उष्माघात कक्ष’ सज्ज (फोटो सौजन्य-पोपट पिटेकर)
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्याच्या तापमानात मोठी वाढ झाली आहे. सकाळी १० वाजल्यापासूनच उन्हाच्या झळा लागण्यास सुरुवात होते, तर दुपारी १२ ते ४ या वेळेत उन्हाची तीव्रता अत्युच्च पातळीवर असते. यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळल्याने शहरातील प्रमुख बाजारपेठा आणि रस्ते ओस पडत आहेत. शेतीकामांवरही याचा मोठा परिणाम झाला असून, मजूर आणि शेतकरी पहाटे किंवा सायंकाळी कामाला प्राधान्य देत आहेत.
“जनाची नाही तर मनाची तरी ठेवा” ; लोकदरबारात MMRDA अधिकाऱ्यांवर मंत्री प्रताप सरनाईकांचा संताप
वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांना उष्माघाताचा त्रास होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
“जिल्ह्यातील वाढती उष्णता पाहता आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत. उष्माघात कक्षात थंड हवा, पुरेशी औषधे, ओआरएस (ORS) पाकिटे आणि आयव्ही फ्लुइड्सचा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. तातडीच्या उपचारांसाठी डॉक्टरांचे विशेष पथकही तैनात करण्यात आले आहे.”, अशी माहिती जिल्हा रुग्णालय तज्ज्ञ डॉ. श्रीकांत पाठक यांनी दिली.
जिल्हा रुग्णालयाचे तज्ज्ञ डॉ. श्रीकांत पाठक यांनी नागरिकांना स्वतःचे संरक्षण करण्यासाठी खालील सूचना केल्या आहेत:
वेळेचे नियोजन: अत्यंत आवश्यक काम नसल्यास दुपारी १२ ते ४ या वेळेत उन्हात जाणे टाळावे.
पाण्याचे महत्त्व: तहान लागलेली नसली तरीही भरपूर पाणी प्यावे. शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी ताक, लिंबू सरबत, नारळ पाणी यांसारख्या पेयांचा वापर करावा.
पेहराव: बाहेर पडताना फिकट रंगाचे, सैल सुती कपडे वापरावेत. डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर अनिवार्य करावा.
आहारावर नियंत्रण: पचनास जड असलेले किंवा तेलकट पदार्थ खाणे टाळावे.
जर कोणाला तीव्र ताप, चक्कर येणे, मळमळणे, डोकेदुखी, जास्त घाम येणे किंवा शुद्ध हरपणे यांसारखी लक्षणे जाणवल्यास, तो उष्माघाताचा प्रकार असू शकतो. अशा वेळी रुग्णाला तातडीने सावलीत आणून थंड पाण्याने पुसावे आणि जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या जिल्ह्यात पुढील काही दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून, प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.