
अतिक्रमणाविरोधात दुसऱ्यांदा नोटीस बजावण्याचे काम सुरु
शहर हद्दीत नगरपरिषदेची पूर्वपरवानगी न घेता स्टॉर्म वॉटर लाईनपासून तीन मीटर अंतराच्या आत उभारण्यात आलेली बांधकामे नियमबाह्य असल्याचा ठपका ठेवत प्रशासनाने पहिल्या टप्प्यात नोटिसा बजावल्या आहेत. बीड रस्त्यावरील १७३ आणि नगर रस्त्यावरील १७६ अशा एकूण ३४९ अतिक्रमणधारकांना नोटिसा देण्यात आल्या असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
Ahilyanagar News: गोदड महाराज मंदिरात नवे विश्वस्त, संतप्त ग्रामस्थांकडून मंदिरासमोर धरणे आंदोलन
विशेष म्हणजे, नोटीस बजावल्यानंतर दिलेल्या विहित मुदतीत एकाही अतिक्रमणधारकाने आवश्यक कागदपत्रे सादर करून लेखी स्पष्टीकरण नगरपरिषदेकडे दिले नाही, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, आता दुसऱ्या टप्प्यातील नोटिसांचे वितरण सुरू करण्यात आले आहे.
नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय साळवे यांच्या स्वाक्षरीने देण्यात आलेल्या नोटिशीत संबंधितांना बांधकाम परवानगी, जागेची मालकी कागदपत्रे, मोजणी नकाशा आदी पुरावे तीन दिवसांच्या आत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अन्यथा संबंधित बांधकाम अनधिकृत समजून ते संबंधित यंत्रणेमार्फत हटवले जाईल आणि त्याचा खर्च संबंधितांकडून वसूल केला जाईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
प्रशासनाच्या मते, शहरातील प्रस्तावित पाणीपुरवठा योजना आणि भुयारी गटार योजनेच्या कामांना अडथळा निर्माण होऊ नये, तसेच रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने अडथळे दूर करणे आवश्यक असल्यामुळे ही कारवाई केली जात आहे.
राष्ट्रीय महामार्गांवरील नियंत्रण अधिकार प्रामुख्याने संबंधित विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे असतात. मात्र, शहर हद्दीत स्थानिक स्वराज्य संस्थेची बांधकाम परवानगी घेणे आणि नाले किंवा स्टॉर्म वॉटर लाईनपासून सुरक्षित अंतर राखणे बंधनकारक असते.
या नियमांचे उल्लंघन करून उभारण्यात आलेली बांधकामे कायदेशीर चौकटीत बसत नसल्याचा दावा नगरपरिषदेने केला आहे.
दरम्यान, काही उद्योजकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अतिक्रमणधारकांच्या समर्थनार्थ भूमिका मांडली आहे. तर अतिक्रमणे हटवण्याच्या मागणीसाठी अवधूत पवार यांनी दोन दिवस उपोषण केले असून ५ मार्चपर्यंत साखळी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि नागरिकांमध्ये संवादातून तोडगा निघतो की संघर्ष तीव्र होतो, याकडे संपूर्ण जामखेड शहराचे लक्ष लागले आहे.