
सौर प्रकल्प बसवून देखील शेतकऱ्यांना लाखोंचे वीजबिल!
Ahilyanagar News: अतिक्रमणाचा प्रश्न चिघळला! जामखेडमध्ये बेमुदत बंदचा इशारा
टाकळी काझी येथील शेतकरी सचिन म्हस्के यांनी महावितरणची विधिवत परवानगी घेऊन ३ किलोवॅट क्षमतेचा सौर प्रकल्प उभारला. सौर ऊर्जेमुळे वीजबिलात मोठी घट होण्याची अपेक्षा असताना, त्यांना उलट हजारोंची थकबाकी दाखवून अवाजवी बिल पाठवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तसेच देवगाव येथील शेतकरी गुलाब मोहन वामन यांनी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ३ किलोवॅट सौर प्रकल्प बसविला. मात्र त्यांना तब्बल ४ लाख ३२ हजार रुपयांचे अविश्वसनीय व तांत्रिकदृष्ट्या अशक्यप्राय बिल पाठवण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
शेतकऱ्यांच्या मते, नेट मीटरिंगची योग्य वजावट न करणे, मीटर रीडिंगची अचूक तपासणी न करणे आणि प्रणालीतील त्रुटी वेळेत दुरुस्त न करणे या बाबींमध्ये गंभीर निष्काळजीपणा झाला असल्याचा आरोप करण्यात आला. अवाजवी व चुकीची बिले तात्काळ रद्द करण्यात यावीत. विनाकारण वीजपुरवठा खंडित करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. जिल्हास्तरावर नेट मीटरिंग संदर्भात विशेष तपासणी समिती स्थापन करावी.
“सौर प्रकल्प बसवणाऱ्या शेतकऱ्यांवर लाखोंची बिले लादून त्यांना आर्थिक संकटात ढकलण्याचा प्रयत्न आम्ही सहन करणार नाही. ही प्रकरणे तातडीने मार्गी लावली नाहीत तर तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा संतप्त शेतकऱ्यांनी दिला आहे. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश पोटे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.