
मढीत वाहतूककोंडीदरम्यान पोलिसांचा भाविकांना ‘प्रसाद’?
श्रीक्षेत्र मढी येथील कानिफनाथ महाराजांच्या यात्रेसाठी आलेल्या भाविकांना पाथर्डी पोलिसांच्या अरेरावीचा सामना करावा लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वाहतूक कोंडी सोडवताना पाथर्डीचे पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांनी भाविकांना दमदाटी करत वाहनांच्या काचा फोडल्याच्या गंभीर तक्रारी आहेत. तसेच एका माजी महिला नगरसेविकेला मारहाण केल्याची तक्रार वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या 260 शाळांवर असणार CCTV चा ‘डोळा’; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य
मढी येथील कानिफनाथांच्या यात्रेनिमित्त राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले होते. यामुळे नगर-पाथर्डी रस्त्यावर तिसगावाजवळ वाहनांच्या ४ ते ५ किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तासनतास सुरू असलेल्या या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचे हाल होत होते. ही कोंडी फोडण्यासाठी पोलिस निरीक्षक विलास पुजारी स्वतः रस्त्यावर उत्तरले होते. यावेळी संभाजीनगर येथील शिवसेना नेते नीलेश बाबुराव शिंदे आणि त्यांच्या मातोश्री माजी नगरसेविका पद्मा शिंदे हे आपल्या फॉच्युनर गाडीने (क्र. एमएच २० एचएन ०००८) एका विवाह सोहळ्यासाठी चालले होते. वाहतूक कोंडीत सापडल्याने ते थांबले होते. त्यांना व त्यांच्या मातोश्रीस उद्धट वागणूक देत मारहाण करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
प्रवासी नीलेश शिंदे यांनी सांगितले की, आम्ही त्यांना ‘काचेवर का मारता?’ असे विचारले असता, त्यांनी माझ्या आईला व मला शिवीगाळ केली. माझ्या आईच्या (पदमाताई शिंदे) पायावर जोरात काठी मारली.
एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने महिला लोकप्रतिनिधीवर हात उचलणे, वाहनांचे नुकसान करणे बेकायदेशीर असल्याचे नीलेश शिंदे यांनी म्हटले आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे केली आहे.
नीलेश शिंदे यांनी या संदर्भात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले, की पोलिस निरीक्षक पुजारी यांनी हातात लाकडी दांडा घेऊन अडकलेल्या वाहनांवर प्रहार केले. शिंदे यांच्या गाडीच्या काचेवरही त्यांनी दांडा मारला. शिंदे आणि त्यांच्या मातोश्री यांनी गाडीखाली उतरून विचारणा केली असता त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ, मारहाण केल्याचे निवेदनात म्हटले आहे.
या सर्व आरोपांवर पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांनी आपली बाजू मांडली आहे. ते म्हणतात, मढी यात्रेमुळे नगर-पाथर्डी रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. ही कोडी सोडवताना प्रवाशांमध्ये किरकोळ बाचाबाचीचे प्रकार घडले आहेत. मात्र गाडीची काच फोडणे किंवा मारहाण करणे अशी कोणतीही घटना घडलेली नाही.