
एकाच खिडकीवर भार, ज्येष्ठ नागरिक ताटकळत
सकाळपासूनच शेकडो ज्येष्ठ नागरिक स्मार्ट कार्डसाठी तारकपूर स्थानकात जमा झाले आहेत. मात्र, एवढ्या मोठ्या संख्येने येणाऱ्या नागरिकांसाठी महामंडळाने केवळ एकच काउंटर सुरू ठेवले आहे. एकाच खिडकीवर सर्व भार असल्याने काम अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे, परिणामी ज्येष्ठ नागरिकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे.
सुविधांचा अभाव: ना बसण्याची सोय, ना पिण्याचे पाणी
रांगेत उभे असलेले बहुतांश नागरिक हे 70 ते 80 वयोगटातील आहेत. वाढत्या उन्हाचा तडाखा आणि शारीरिक व्याधी असूनही प्रशासनाने त्यांच्यासाठी कोणतीही मूलभूत व्यवस्था केलेली नाही. बैठक व्यवस्थरांगेत उभे राहून थकलेल्या वृद्धांना बसण्यासाठी साधी बाके किंवा खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आलेली नाही. पिण्याच्या पाण्याची कोणतीही सोय उपलब्ध नसल्याने ज्येष्ठ नागरिकांचे हाल होत आहेत.”आम्ही तासनतास या रांगेत उभे आहोत. सरकार सवलती जाहीर करते, पण त्या मिळवण्यासाठी आम्हाला अशा प्रकारे लाचार केले जात आहे. किमान पिण्याचे पाणी आणि बसण्यासाठी खुर्च्या तरी प्रशासनाने पुरवायला हव्या होत्या,” अशी संतप्त प्रतिक्रिया एका ज्येष्ठ नागरिकाने दिली.
नागरिकांचा संताप आणि मागणी
प्रशासनाच्या या आडमुठ्या धोरणामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळत आहे. जर गर्दी जास्त आहे, तर तत्काळ अतिरिक्त काउंटर का उघडले जात नाहीत? असा सवाल प्रवाशांनी उपस्थित केला आहे. जोपर्यंत प्रशासकीय यंत्रणा सुधारत नाही आणि ज्येष्ठांना सन्मानाची वागणूक मिळत नाही, तोपर्यंत अशा योजना केवळ नावापुरत्याच उरतील, अशी भावना व्यक्त होत आहे.प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन अतिरिक्त खिडक्या सुरू कराव्यात आणि ज्येष्ठांसाठी पाण्याची, बसण्याची सोय करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.