
अहिल्यानगरमध्ये ‘ग्रामीण AI समिट’चा उत्साह; सावेडीतील माऊली संकुलात तंत्रज्ञानाचा जागर
पोपट पिटेकर, अहिल्यानगर : शहरातील सावेडी परिसरातील माऊली संकुल येथे आज ‘ग्रामीण AI समिट’ (Rural AI Summit) चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील जनतेला आणि युवकांना कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रवाहात सामील करून घेण्याच्या उद्देशाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले असून, यात जिल्ह्यासह परिसरातील तंत्रज्ञान प्रेमींनी मोठी गर्दी केली आहे.
या भव्य सोहळ्याचे उद्घाटन आमदार संग्राम भैय्या जगताप, अहिल्यानगर यांच्या हस्ते संपन्न झाले. “AI भारताचे भवितव्य घडवत असून अहिल्यानगरमध्ये स्टार्टअप आणि तंत्रज्ञान केंद्र बनण्याची मोठी क्षमता आहे,” ही संकल्पना नितीन उदमले यांनी मांडली होती, ज्याला या परिषदेच्या निमित्ताने मूर्त स्वरूप प्राप्त झाले.
या एकदिवसीय समिटमध्ये सकाळपासूनच विविध सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये देशातील नामवंत आयटी तज्ज्ञ, एआय संशोधक आणि मार्गदर्शक उपस्थित होते.
ग्रामीण विकासात AI चा वापर: शेती, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात एआय कशी क्रांती घडवू शकते.
रोजगाराच्या संधी: ग्रामीण भागातील तरुणांना घरबसल्या एआयच्या माध्यमातून कोणत्या रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत.
भविष्यातील तंत्रज्ञान: पुढील दशकात एआयमुळे दैनंदिन जीवनात होणारे बदल.
अहिल्यानगरमध्ये अशा प्रकारची ही पहिलीच मोठी परिषद असल्याचे बोलले जात आहे. सहसा मोठ्या शहरांपुरती मर्यादित असलेली ही चर्चा आता ग्रामीण स्तरावर पोहोचल्याने, स्थानिक उद्योजक आणि विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे.
या समिटमध्ये केवळ भाषणेच नव्हे, तर एआय टूल्सचे लाईव्ह डेमोस्ट्रेशन देखील दाखवले जात आहेत. दिवसभर चालणाऱ्या या उपक्रमामुळे अहिल्यानगरच्या तंत्रज्ञान क्षेत्रात एक नवी दिशा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दादासाहेब भगत (संस्थापक CEO, डोरग्राफिक्स): “या समिटमुळे ग्रामीण युवकांना सक्षम केले जाईल. यामुळे मोठ्या प्रमाणात स्थानिक स्तरावर रोजगार निर्मिती होईल आणि जिल्ह्याच्या विकासाला गती मिळेल.”
आनंदजी भंडारी (CEO, जिल्हा परिषद): “अहिल्यानगरमध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारच्या उच्च तंत्रज्ञान परिषदेचे आयोजन होणे, ही अभिमानाची गोष्ट आहे.”
सकाळपासूनच माऊली संकुल येथे जिल्ह्यातील विद्यार्थी, तंत्रज्ञान प्रेमी आणि स्थानिक उद्योजकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. एआय विषयावर लोकांमध्ये असलेली उत्सुकता आणि शिकण्याची जिद्द यामुळे संपूर्ण परिसर तंत्रज्ञानाच्या उर्जेने भरून गेला होता. सहसा मोठ्या शहरांपुरती मर्यादित असलेली ‘एआय’ची दारे आता ग्रामीण भागासाठी खुली झाली आहेत. या समिटमुळे अहिल्यानगरमध्ये स्टार्टअप संस्कृतीला बळ मिळणार असून, ग्रामीण अर्थव्यवस्थेला एक नवी दिशा मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.