
एम्सच्या जेवणात किडे आढळल्याने खळबळ
नागपूर : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) नागपूर येथे मेसमध्ये विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या जेवणात किडे आढळले. याप्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन (एफडीए) च्या अन्न शाखेच्या दोन सदस्यीय पथकाने एम्स कॅम्पसची अचानक तपासणी केली. यावेळी कंत्राटदाराला नोटीस बजावत दोन दिवसांच्या आत सर्व त्रुटी दूर करण्याचे निर्देश दिले आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी तडजोड सहन केली जाणार नाही, असा इशारा देत परवाना रद्द करण्याची कारवाई केली जाईल, असे एफडीएने स्पष्ट केले.
तपासणीदरम्यान मेसमध्ये अनेक अनियमितता आढळल्या. वापरल्या जाणाऱ्या पाण्याचे चाचणी अहवाल उपलब्ध नव्हते. स्वयंपाकघरात धूर बाहेर काढण्याची योग्य व्यवस्था नव्हती. तसेच काही ठिकाणी टाइल्स तुटलेल्या अवस्थेत आढळल्या. मेस कर्मचाऱ्यांकडून वैद्यकीय प्रमाणपत्रांची मागणी केली असता ती सादर करता आली नाहीत. एफडीएचे अधिकारी किरण गेडाम यांच्यासह पथकाने मेसची पाहणी करून विद्यार्थी प्रतिनिधींशी चर्चा केली. सुरुवातीला विद्यार्थ्यांनी मेस ऑपरेटरविरोधात औपचारिक तक्रार दाखल करण्यास नकार दिला. मात्र, अधिकाऱ्यांनी त्यांना तक्रार दाखल केल्यास नावे गोपनीय ठेवली जातील, असे सांगितल्यावर तक्रार दिली गेली.
दरम्यान, एफडीए पथकाने एम्स प्रशासनाकडून मेस पुरवठादारासोबत झालेल्या कराराची कागदपत्रे मागवली आहे. सोशल मीडियावर व्हायरल फोटोंबाबतही माहिती मागितली आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार, अनेक अधिकारीदेखील त्याच मेसमध्ये जेवतात.
मेसमध्ये येणाऱ्यांची घेतली जात आहे माहिती
दररोज मेसमध्ये जेवण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आणि उपलब्ध सुविधा याबाबतही माहिती संकलित केली. एफडीएच्या कारवाईनंतर मेस व्यवस्थेवर अधिक काटेकोर देखरेख ठेवण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य दिले जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
वाळूज परिसरातील 22 विद्यार्थ्यांना विषबाधा
दुसऱ्या एका घटनेत, काही दिवसांपूर्वीच वाळूज परिसरातील एका शाळेच्या वतीने सहलीला गेलेल्या 40 विद्यार्थी व पाच शिक्षकांपैकी एक शिक्षक व 22 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली असल्याची शक्यता आहे. त्यांच्यावर सुप्याच्या रुग्णालयात उपचार करण्यात आले. यामध्ये एक शिक्षक व तीन विद्यार्थी गंभीर असल्याने त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. ही अत्यंत खळबळजनक घटना समोर आली.
हेदेखील वाचा : जलजीरा प्यायल्याने विद्यार्थिनींना झाली विषबाधा; मुख्याध्यापकांची कार्यतत्परता अन् वाचले मुलींचे प्राण