
विठुरायाच्या वारीत आता आकाशातूनही आरोग्यसेवा; अत्यावश्यक रुग्णांसाठी एअर ॲम्बुलन्सची सुविधा - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर
पंढरपूर /शिवाजी हळणवर : आषाढी वारीत लाखो वारकऱ्यांच्या आरोग्य सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत राज्य शासनाने यंदा प्रथमच अत्यावश्यक रुग्णांसाठी एअर ॲम्बुलन्सची सुविधा उपलब्ध करून देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर आयोजित आरोग्य सुविधांच्या आढावा बैठकीत ही माहिती दिली.
मंत्री आबिटकर म्हणाले की, वारकरी घरातून वारीसाठी निघाल्यापासून ते सुखरूप घरी परतेपर्यंत आवश्यक त्या सर्व आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. गर्दीच्या परिस्थितीत गंभीर रुग्णांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी यंदा प्रथमच एअर ॲम्बुलन्सची सुविधा सुरू करण्यात येत असून, ही वारीसाठी मोठी आणि नावीन्यपूर्ण पायरी ठरणार आहे.
यंदाच्या वारीत ‘आरोग्य संपन्न वारी’ आणि ‘वारी सहाय्य’ या डिजिटल उपक्रमांद्वारे वारकऱ्यांना तात्काळ आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. प्रत्येक आरोग्य कर्मचारी आणि आशा सेविकेमार्फत भाविकांना आवश्यक माहिती आणि मार्गदर्शन दिले जाणार आहे.
देहूनगर पंचायत पालखी सोहळ्यासाठी सज्ज; चाळीस कॅमेऱ्यांची नजर
वारीत आरोग्य सेवेसाठी पालखी मार्गावर ४३ ठिकाणी सुसज्ज आयसीयू, १५६ ठिकाणी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’, तसेच २१५ फिरते आरोग्य दूत कार्यरत राहणार आहेत. पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये १६ आयसीयू कक्ष व १७ तात्पुरते ‘आपला दवाखाना’ सुरू करण्यात येणार आहेत.याशिवाय पालखी मार्गावर ३५३ रुग्णवाहिका, बाईक ॲम्बुलन्स आणि आपत्कालीन आरोग्य सेवा सज्ज ठेवण्यात येणार आहेत. दिंडी प्रमुखांना प्राथमिक उपचार किटचे वाटप केले जाणार असून, ३,०८७ वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी तसेच ३०२ तज्ज्ञ डॉक्टर वारी सेवेसाठी नियुक्त करण्यात आले आहेत.
पंढरपूर शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये १० टक्के खाटा आरक्षित ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. तसेच वारकरी भाविकांच्या मोठ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये तीन दिवस विशेष आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.
पालखी सोहळ्यासाठी पिंपरी-चिंचवड सज्ज; महापौर रवि लांडगे यांनी प्रशासनाला दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश
बैठकीत आ. समाधान आवताडे यांनी २०० खाटांच्या जिल्हा रुग्णालयाचे काम गतीने पूर्ण करण्याची मागणी केली. आ. राजू खरे यांनी पालखी मार्गावरील आरोग्य सुविधा आणि स्वच्छतेवर भर दिला. आ. अभिजीत पाटील यांनी ६५ एकर परिसरात विशेष आरोग्य शिबिर आयोजित करण्याची सूचना केली, तर नगराध्यक्षा प्रणिता भालके यांनी वारीनंतर संसर्गजन्य आजार रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याची मागणी केली.
बैठकीनंतर आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन स्वच्छतेची पाहणी केली, रुग्णांशी संवाद साधला आणि उपलब्ध आरोग्य सुविधांची माहिती घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.