सौजन्य - नवराष्ट्र टीम
पिंपरी : आषाढी एकादशीच्या निमित्ताने निघणाऱ्या संतश्रेष्ठ श्री संत ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यासाठी पिंपरी-चिंचवड सज्ज झाले आहे. या पार्श्वभूमीवर, शहरातून मार्गस्थ होणाऱ्या वारकरी बांधवांच्या सुरक्षेसाठी पालखी मार्गावर ‘टेहळणी टॉवर’ (वॉच टॉवर) उभारण्यात यावेत, तसेच स्वच्छतेसह सर्व नागरी सुविधा चोख ठेवाव्यात, असे स्पष्ट निर्देश पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर रवि लांडगे यांनी आज प्रशासनाला दिले आहेत.
महापौर रवि लांडगे यांनी आज सकाळी आठ वाजल्यापासून पालखी मार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली. मॅगझीन चौक येथून या पाहणी दौऱ्याची सुरुवात झाली. त्यानंतर भक्ती-शक्ती चौक, निगडी येथे महापौरांनी विविध विभागांच्या कामांचा सविस्तर आढावा घेतला.
“पालखी सोहळा हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि सामाजिक परंपरेचा अमूल्य वारसा आहे. त्यामुळे शहरात येणाऱ्या लाखो वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारची गैरसोय जाणवू नये. सर्व विभागांनी परस्परांमध्ये समन्वय ठेवून अत्यंत जबाबदारीने काम करावे.” — रवि लांडगे, महापौर (पिंपरी-चिंचवड महापालिका).
सर्व विभागांच्या तयारीचा घेतला आढावा
दौऱ्यादरम्यान महापौरांनी पालखी मार्गावरील खालील प्रमुख सोयी-सुविधांची अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली.
आरोग्य व स्वच्छता : मार्गावरील स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य देत चलत शौचालये (मोबाईल टॉयलेट्स), आरोग्य पथके आणि रुग्णवाहिकांची चोख व्यवस्था करणे.
पाणी व विद्युत : पिण्याच्या पाण्याची अखंडित व्यवस्था, पुरेशी प्रकाश व्यवस्था आणि आवश्यक तेथे दिशादर्शक फलक लावणे.
सुरक्षा व आपत्ती व्यवस्थापन : अग्निशमन यंत्रणा, आपत्कालीन सेवा आणि वाहतूक पोलिसांशी समन्वय ठेवून करण्यात आलेले वाहतूक नियोजन.
तसेच, पालखी मार्गावर वारकऱ्यांच्या काही सूचना किंवा अडचणी आल्यास त्यावर संबंधित विभागांनी तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देशही त्यांनी दिले. महापौरांनी नागरिकांनाही प्रशासनाला सहकार्य करण्याचे, स्वच्छता राखण्याचे आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
हे सुद्धा वाचा : पालखी सोहळ्यासाठी पोलिसांचे विशेष नियोजन; दर्शनासाठी असणार एकेरी मार्ग
वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती
या पाहणी दौऱ्यावेळी महापौरांसोबत अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, सह शहर अभियंता बापू गायकवाड, उप आयुक्त अण्णा बोदडे, क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे उपस्थित होते. याशिवाय निवेदीता घार्गे, कार्यकारी अभियंता शिवाजी चौरे, दमयंती पवार, चंद्रकांत मुथाळ, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह आरोग्य, पाणीपुरवठा, विद्युत व आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.






