
उष्मालाटेसह आता अवकाळीची शक्यता
अकोला : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. त्यातच अकोला जिल्ह्यात बुधवार (दि.29) ते ३ मेदरम्यान उष्णतेची लाट राहील. तसेच या कालावधीत अवकाळी पावसाची शक्यताही नागपूर येथील प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तविली. या काळात नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले. यादरम्यान ताशी ४० ते ५० किमी प्रतितास याप्रमाणे हवेचा वेग राहण्याची शक्यता आहे. त्यानुसार, आवश्यक दक्षता घेण्याबाबत सूचित करण्यात येत आहे.
उष्मालाट असल्याने दुपारी १२ ते ४ या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे, बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत, उन्हात वाहने शक्यतो चालवू नये, ज्वलनशील पदार्थांपासून शक्यतो दूर राहावे. लहान मुले व पाळीव प्राण्यांना गेट बंद असलेल्या वाहनात तसेच पार्क केलेल्या वाहनात ठेऊ नये. तहान लागलेली नसली तरी जास्तीत जास्त पाणी पिण्यात यावे. अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम आदी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा.
कामगार, नागरिकांसाठी तातडीच्या उपाययोजना
उष्मालाटेमुळे सर्वाधिक प्रभावित होणारे घटक म्हणजे बांधकाम कामगार, वीटभट्टया कामगार, खाणकाम, शेती व असंघटित क्षेत्रातील कामगार आहेत. त्यासाठी विविध विभाग, यंत्रणा, आस्थापनांनी कार्यस्थळावर उपाययोजना करण्याचे निर्देश आहेत. तीव्र उष्णलाटांपासून बचावासाठी कामाचे वेळापत्रक पुन्हा नियोजित करावे. याबाबत वेळोवेळी आढावा घेऊन कार्यवाही करावी. कार्यस्थळी उन्हापासून बचावासाठी पुरेशी व्यवस्था करावी.
तसेच सदर ठिकाणी विश्रांती व्यवस्था करावी. आवश्यकतेनुसार कूलर व अनुषंगिक व्यवस्था सुनिश्चित करावी. पुरेशा प्रमाणात पिण्याचे पाणी, इलेक्ट्रोलाइट पूरक पदार्थ, आणि आपत्कालीन आईस पॅक उपलब्ध करून देण्यात यावे. कामगारांच्या नियमित आरोग्य तपासणीसाठी आरोग्य विभागाशी समन्वय साधून करण्यात यावी.
शेतमाल सुरक्षित ठिकाणी ठेवावा
पशुधनास तसेच पाळीव प्राण्यांना छावणीत ठेवण्यात यावे. तसेच त्यांना पुरेसे पिण्याचे पाणी देण्यात यावे. वीज, वारा व पावसापासून बचावाकरिता सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्यात यावा. अशा स्थितीत झाडाखाली आश्रय घेऊ नये. पाऊस व विजांच्या स्थितीत मोबाईल फोनचा उपयोग टाळावा. शेतकऱ्यांनी आपला शेतमाल सुरक्षित ठिकाणी ठेवावा, अशा सूचना केल्या.
जड कामे दिवसातील थंड वेळेत करावीत
उष्णतेचा ताण जाणवत असल्यास कामगारांना कामाचा वेग कमी करण्यास परवानगी द्यावी. जड कामे दिवसातील थंड वेळेत होतील याबाबत नियोजन करावे. अत्यंत उष्णतेच्या परिस्थितीत कामासाठी २ व्यक्तींच्या पथकाची अट लागू करावी. कार्यस्थळाजवळ विश्रांतीसाठी जागा उपलब्ध करून देणे व थंड पाण्याची व्यवस्था सुनिश्चित करावी.
जनजागृती मोहीम राबवावी
कामगार काम करीत असलेला भाग, ठिकाणे व सार्वजनिक ठिकाणी उष्णतेच्या धोक्यांविषयी जनजागृती मोहीम राबवावी. जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुख व प्रामुख्याने उपसंचालक औद्योगिक सुरक्षा, सहायक आयुक्त कामगार कल्याण यांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून निर्देश दिले.
राज्यात उष्णतेचा कहर; अकोला पुन्हा तापला, तापमानाचा पारा 46 अंश पार