
अखेर आंबेनली घाट संपूर्ण वाहनांसाठी आज पासून चार दिवस बंद (Photo Credit- X)
पोलादपूर आंबेनळी महाबळेश्वर राज्य महामार्ग हा सह्याद्री पर्वतरांगेतील अत्यंत संवेदनशील, भूस्खलनप्रवण, दरडप्रवण व उच्च जोखीम असलेल्या घाट विभागातून जात असून, सदर मार्गाची भौगोलिक, भूगर्भीय व हवामानविषयक वैशिष्ट्ये विचारात घेतल्यास पावसाळ्याच्या कालावधीत हा मार्ग सार्वजनिक वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक ठरतो.
सदर मार्गाचा मोठा भाग तीव्र उतार, खोल दऱ्या, नैसर्गिक जलप्रवाह, हवामानामुळे विदीर्ण झालेले बेसॉल्ट खडक, अस्थिर मातीचे थर, दाट वनक्षेत्र तसेच भूस्खलनास प्रवृत्त होणाऱ्या भूभागामधून जातो. भारतीय हवामान विभागाच्या नोंदीनुसार या परिसरात दरवर्षी अतिमुसळधार पर्जन्यवृष्टी होत असून अनेक वेळा अल्प कालावधीत अत्यंत तीव्र स्वरूपाचा पाऊस नोंदविला जातो.
अतिवृष्टीमुळे उतारांची स्थिरता कमी होऊन मोठ्या प्रमाणावर भूस्खलन, दरड कोसळणे, दगड घसरणे व भूस्तर खचणे अशा घटना घडतात. अशा घटना कोणतीही पूर्वसूचना न देता घडण्याची शक्यता असल्यामुळे सार्वजनिक वाहतुकीवर गंभीर परिणाम होऊ शकतो.आठवड्या भरात दोन वेळा पोलादपूर हद्दीत मार्गवर दरड खाली आल्याने पुढील चार दिवस वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.
सार्वजनिक सुरक्षिततेस प्राधान्य देत जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड यांच्याकडून वेळोवेळी घाटबंदीचे आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत. अशा प्रतिबंधात्मक आदेशांमुळे संभाव्य जीवितहानी, वाहतूक अपघात व आपत्तीजन्य परिस्थिती मोठ्या प्रमाणात टाळता आलेली आहे. सध्या सदर महामार्गावर विविध सुरक्षा सुधारणा, संरक्षण भिंती, क्रैश बॅरिअर्स, ड्रेनेज सुधारणा व इतर सुरक्षाविषयक कामे प्रगतीपथावर असून अत्यंत प्रतिकूल हवामान परिस्थितीमध्ये नैसर्गिक आपत्तीचा धोका उदभवू शकतो. वरील सर्व बाबींचा विचार करता, सदर मार्ग हा पावसाळ्यामध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने घाटबंदी आदेश निर्गमित करण्यात आले आहेत घाट बंद च्या काळात पुणे सातारा कडे जाणाऱ्या प्रवासी वर्गाने महाड माणगांव ताम्हणी घाट किंवा पोलादपूर चिवळून कराड मार्गाचा वापर करावे असे सूचित केले आहेत.
कोकणातल्या रस्त्यांना बसला पावसाचा फटका, आंबेनळी घाटासह ‘या’ मार्गाने जाणं टाळा